सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

#👍"नियतीचा संकेत !":👍😊#

 

👍"नियतीचा संकेत-१":👍🎂
गेल्या चार दशकांच्या माझ्या ज्योतिष अभ्यासामुळे आणि अनेक पत्रिकांच्या निरीक्षणामुळे काही गोष्टी ध्यानात आल्या. त्यापैकी एक दोन इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

माणसाच्या जीवनाची एकंदर वाटचाल असते, ती नेहमी सुलभ असतेच असं नाही. कुणाची खडकाळ खेड्यातल्या रस्त्यासारखी, तर कुणाचे जंगलातल्या आडवाटेची, याउलट काही नशिबवान मंडळींची 'एक्सप्रेस हायवे'वरून अथवा चांगल्या डांबरी रस्त्यावरून सुलभपणे जाणारी. शेवटी प्रत्येकाचे जीवन वेगळे, जीवनशैली वेगळी आणि आपण ज्याला नशीब म्हणतो ते नशीब वेगळे.

👍एक-दोन पत्रिका अशा माझ्या नजरेत आल्या की, त्यांचे सर्वसाधारण आयुष्य इतरांच्या तुलनेने सरळ, सुलभ, त्यांना मनाजोगत्या घडणाऱ्या अशा घटनांमधून, आनंदी समाधानी आणि यशस्वी होत गेलं. त्या दोन पत्रिकांमध्ये मला जे साम्य आढळलं ते इथे मांडतो.

👍एका पत्रिकेत कन्या लग्न, कन्या राशीत उच्चीचा बुध, व्ययात स्वगृही रवि आणि लाभात कर्केचा चंद्र, अष्टमात मेषेचा गुरू अशी एक पत्रिका. तर दुसऱ्या पत्रिकेत लग्नी शनी, सप्तमात स्वगृही गुरु, व्ययात चंद्र, बुध केतु शुक्र आणि लाभात चंद्राच्या अन्योन्य योगात रवी. दोघांच्याही आयुष्याची जीवनरेखा सरळ, आनंदी, समाधानी अशीच होत गेली. नेहमी दान त्यांच्या मनाप्रमाणे पडत गेलं आणि त्यांना कुटुंबामध्ये नेहमीच मानसन्मान मिळत गेला.

पहिल्या पत्रिकेत लग्नी उच्चीचा बुध स्वगृही, लाभात कर्केचा चंद्र आणि व्ययातील सिंहेच्या रवीचा अष्टमातील गुरु बरोबर नवपंचम योग हे पहिल्या पत्रिकेचे वैशिष्ट्य. तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये रवि चंद्र अन्योन्य योग होत असल्यामुळे जणू काही ते स्वगृही असल्यासारखे. सप्तमातील गुरुचा लाभातील रवी बरोबर पहिल्या पत्रिकेप्रमाणे शुभ त्रिकोणयोग किंवा नवपंचम योग. अशी या दोन पत्रिकांमधील अनेक साम्यस्थळे आढळली. तसेच त्यांच्या जीवनाची एकंदर नौका देखील वादळात न सापडता, आनंददायी सुखाची अशी होत गेली. याचा अर्थ लाभस्थान आणि लग्नस्थान यांना जर चांगला योग घडवून आणणारे ग्रह असले आणि रवी गुरु नवपंचम योग असला तर पुष्कळदा आपल्या आयुष्यात जे घडायला हवं तसंच घडत जाऊ शकतं. असं हे माझं निरीक्षण.

👍"दुसरे उदाहरण":
आता ह्या ज्या तीन पत्रिका आहेत, त्यामध्ये मी संतती सुख आणि पत्रिकेतील मंगळाची स्थिती या दृष्टीने निरीक्षण केले आहे.

दशमात मंगळ तसा शुभफलदायी. धडाडीचे आत्मविश्वास असणारे, व्यावहारिक जीवनात यशस्वी असं जीवन प्रदान करणारा शक्तिमान मंगळ दशमात असतो. मात्र या तीन पत्रिकांमध्ये
दशमातला मंगळ हा संततीस्थानाला षडाष्टकात असल्यामुळे संतती बाबतीत, या तीनही पत्रिका त्रासदायक अशी फळे देत गेल्या.

पहिल्या पत्रिकेमध्ये हा गृहस्थ व्यावहारिक जीवनात यशस्वी, अत्युच्चपदी गेला खरा, परंतु त्याच्या मुलांच्या विवाहाबद्दल काही ना काही कायम समस्या होत राहिल्या. तो निवृत्त होईपर्यंत देखील त्याच्या मुलांच्या संसाराचा मार्ग सापडला नाही. दुसऱ्या पत्रिकेतही जवळजवळ तसंच. हुशार ग्रहस्थ, कंपनीत चांगल्या पदावर होऊन निवृत्त झाला. मात्र त्याच्या बाबतीत देखील संततीचा घटस्फोट, फसवणूक अशा तर्‍हेचे फळ प्राप्त झाले. तर तिसऱ्या पत्रिकेमध्ये संततीबाबत आरोग्यविषयक समस्या गंभीर अशा होत्या.

👍हे निरीक्षण आहे, दशमस्थानच्या मंगळाचा प्रभाव असं मला या तीनही पत्रिकांवरून वाटलं, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. पत्रिकेमधील इतर ग्रहयोगांचाही विचार करायला हवा हे ही मान्य आहे, मात्र कॉमन फॅक्टर म्हणून दशम मंगळाचा विचार केल्यामुळे, मी हे निरीक्षण मांडले. चूकभूल द्यावी घ्यावी. शेवटी "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपने" या न्यायाने माझे हे अनुभवाचे बोल इथे तुमच्याशी शेअर केले.

धन्यवाद
सुधाकर नातू

#👍"वाचा, फुला आणि फुलवा-१ !"💐 # !":

 👍"रंगांची दुनिया":👌💐"रसिकमनांची रसिली यात्रा" !💐

💐"शारदोत्सव !":💐:👍" आजचा दिवस माझा !":👌

"महाराष्ट्र टाईम्स"मध्ये रविवार पुरवणीत नेहमी खूप चांगला वाचनीय मजकूर येतो. विषयांची विविधता हे या पुरवणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पौराणिक कथा एखादी तर असतेच असते, त्याचबरोबर 'दीडदमडी' हा सद्यस्थितीवरील उपहासात्मक, विडंबनात्मक लेख. शिवाय बौद्धिक खाद्य पुरविणारा इतरही साहित्याचा नजराणा तिथे असतो.

दि. ३० जानेवारी'२२ च्या पुरवणीत पहिल्यांदा श्री हेमंत जोगळेकर यांचा 'माझे पहिले संपादक' हा ह मो मराठे यांच्या आठवणी जागवणारा लेख मनाला उभारी देऊन गेला. साहजिकच त्यांना मनापासून दाद देणारा ईमेल देखील पाठवला गेला. ही जी दाद देण्याची प्रक्रिया अथवा प्रोसेस असते ती मनाला आतून सुखावत असते, भारावलेपण आणत असते. असे एखाद दुसरे भारावलेपण जरी आपल्याला एखाद्या दिवशी मिळाले, तरी आपल्याला तो दिवस सार्थकी लागला असे वाटून जात असते. इथे तर रेलचेल झाली

👍"कि चुप रही जुबाँ !":

रविवार मटा पुरवणी मधील मंगला खाडिलकर यांचा सुमन कल्याणपूरकर यांच्यावरील भावमधुर तरल गीतांच्या मर्मस्पर्शी आठवणींना उजाळा देणारा हा चपखल शीर्षकाचा लेख वाचून, मला जे काय वाटले ते शब्दात व्यक्त करणे खरोखर अशक्य आहे. आज ८६ व्या वर्षीही सुमनताई आपल्या आवाजाची गोडी आणि भावमधुरता तशीच राखून आहेत हे वाचून त्यांचे कौतुक वाटले, तसेच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कितीतरी विविध गोष्टींमध्ये कसे मग्न असते, ते उमजून, एका वेगळ्याच उंचीवर या गायिकेला घेऊन गेले ! सध्या अशी माणसेच विरळा. 'आपल्याला रुचत नाही', म्हणून व्यावसायिक  गायनाच्या भागातून निवृत्ती घेतली", हे वाचून खेद वाटला. त्यांच्या गुणांचे अजून कितीतरी कौतुक व्हायला हवं होतं, अशी खंत हा लेख वाचून मनात घर करून गेली.👌

👍"महाराष्ट्राचे भूषण !":

त्यानंतर अ का प्रियोळकर यांनी मराठी भाषेला अथक प्रयत्नांती संशोधन करून, विविध अशी मोलाची ग्रंथसंपदा "मराठी संशोधन मंडळा"च्या माध्यमातून कशी निर्माण केली आणि या संस्थेच्या एकंदर ७५ वर्षाच्या वाटचालीचे अभिमान वाटावे असे कार्य देखील मनाला समाधान देते झाले. आपण मराठी ही अभिजात भाषा म्हणून केवळ मागण्या व उदघोष करतो. पण महाराष्ट्राला भूषण वाटाव्यात अशा "मराठी संशोधन मंडळा"सारख्या संस्थांविषयी कोण किती आस्था दाखवतो ? ह्या संस्था व तिथे कार्यरत असलेले प्रदीप कर्णिक ह्यांच्यासारखे लेखक त्यांच्या परिने निमूटपणे इतकी दशके मराठीसाठी धडपडत आहेत. त्यांना आवश्यक ते आर्थिक सहाय्य व इतर सामुग्री मिळाली पाहिजे, अशी जाग्रुती ह्या डोळ्यात अंजन घालणार्या वाचनातून झाली.👌

👍"उदात्ततेचा खरा प्रश्न":

ह्याच पुरवणीमधील "उदात्ततेचा खरा प्रश्न" हा लोकेश शेवडे यांचा वैचारिक लेख अक्षरशः आपल्याला अंतर्मुख करणारा आणि स्तंभित करणारा असाच आहे. खुनासारख्या गुन्ह्याबद्दल प्रचलित कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच असा अमानुष व कायदा हातात घेणारा गुन्हा घडला, तर त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन खरं म्हणजे होऊ शकत नाही. तो अपराध करणार्‍या गुन्हेगाराला प्रचलित कायद्याप्रमाणे जबर शिक्षा झालीच पाहिजे. तरच सुसंस्कृत अशा व्यवस्थेचे व ती मानणार्या समाजाचे दर्शन घडू शकेल, अशा तर्‍हेचा विचार या लेखातून मिळतो.

दुसर्यांचा जीव घेणार्या गुन्ह्यामध्ये कुठल्यातरी न पटणार्या वेगळ्या कारणांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या बेगडी उदात्ततेचा कधीही उदो उदो होता कामा नये. कारण शेवटी कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही, हेच सत्य अधोरेखित झालं पाहिजे. सध्या चर्चेत असलेल्या वेगवेगळ्या खुनांसारख्या गुन्ह्यांचा आणि त्यावरील शिक्षा तसेच त्या खुन्यांना पाठिंबा दिल्यासारखे उदात्ततेचे गोडवे गाणार्या वर्गाच्या वागण्याचा उहापोह ह्या लेखात संयमित व पटेल अशा शब्दात केला आहे. सुसंस्कृत समाजाला व न्यायप्रिय व्यवस्थेला खरेखुरे काय अभिप्रेत असायला हवे? हा यक्षप्रश्न ह्या वाचनांतून निर्माण होऊन गेला.

👍"उडपी भोजनग्रुहांचा जनक !":

आज सोमवारी तर 'मुंबई षडदर्शन' या सदरात माटुंग्याच्या ए रमा नायक यांनी १९४२मध्ये स्थापन केलेल्या माटुंग्याच्या "उडपी श्रीकृष्ण बोर्डिंगने मुंबईतील खाद्यसंस्कृतीला दिलेले उडपी हॉटेल रुपी योगदान वाचून कसे कोण जाणे डोळ्यातून आनंदाश्रू झिरपत राहिले. हे असेच क्रुतक्रुत्य करणारे अश्रु सुरू जेव्हा जेव्हा होतात, तेव्हा तेव्हा आत्मानंदी चित्त गेल्यासारखे वाटते. कारण ह्याच हाँटेलमध्ये आम्ही अनेक वेळा माफक दरातील सुग्रास भोजन करायला जात असतो. तिथले अनलिमिटेड पापड तर मला खूपच आवडतात. मुंबईतील उडपी हॉटेलांची सुरुवात ह्या ए रमा नायक ह्यांनीच केली हे वाचून, मनामध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला. मीही तिथे जात असल्यामुळे मला या सगळ्या वर्णनाची अधिकच खुमारी वाटली.👌

👍"आयडीयल वाचनसंस्क्रुती !":

त्या अगोदरच्या ह्याच सदरातील लेखात 'आयडियल बुक डेपो'चे कांताशेठ यांच्या वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाच्या अविश्रांत श्रमांचा लेखाजोखा मांडला होता. कोकणातून कोकणातून आलेला एक गरीब माणूस-कांताशेठ ह्यांचे वडील, ग्रंथ व्यवहारात कसे पडले आणि नंतर त्यांची मुले तो ग्रंथ व्यवहार वृद्धिंगत करत त्याचा एक वटवृक्ष कसा करतात, त्याचे हृद्य चित्रण या लेखात केले होते. तो लेखही मनाला भावून गेला. कारण वाचनसंस्कृतीची 'आयडियलची गल्ली' ही मुंबईच्या दादरमधील सांस्कृतिक जीवनात 'छबिलदास प्रायोगिक नाट्यचळवळी'च्या बरोबरीने आपले योगदान देत राहिली, हे नव्याने जाणवले.

💐अशा विविध अनुभवांचे वाचन, आपल्या 

माणूसपणाला जशी जाग आणतो, तद्वतच मनीची रसिकता अधिकच फुलवत, मनातल्या मनात दाद देत जातो. असे जेव्हा होते तेव्हा आपला वेळ वाया न घालवता आपण सार्थकी लावला आणि "आजचा दिवस माझा" असे वाटत, आपण परमानंदी तल्लीन होऊन कधी जातो, ते कळतही नाही.💐

धन्यवाद

सुधाकर नातू

रविवार, ३० जानेवारी, २०२२

# 👍"कल्पनांची ही भरारी !":💐#


👍"रंगांची दुनिया":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा" !💐

💐"कल्पनांची ही भरारी !":💐

👍"कल्पनांची ही भरारी
होतील कां, ही स्वप्ने खरी?
वाचा बरं, ती आता तरी,
पहा येई, कशी ती तरतरी !"👌

👍"आपण किती चाललो ते दर्शविणारे आधुनिक घड्याळ जसं आपल्याला अधिकाधिक चालण्याची प्रेरणा देते, तशा तऱ्हेने आपण रोज किती
शब्द बोललो आणि किती शब्द आपण ऐकले, ते दर्शविणारे एखादे यंत्र निघाले तर किती बहार येईल !

👍"एखादा संदेश किंवा व्हिडिओ किती जणांनी पाहिला ते आपण जसं समजू शकतो, तसंच आपला संदेश किती जणांपर्यंत गेला आणि तो पाहिला, हेही समजून, आपल्या संदेशाची प्रत वा दर्जा कळू शकेल ! खरंच असं होईल कां?

👍"ह्या हृदयीचे त्या हृदयी !":
'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करण्यासाठी, जसे नजरेचे तीर असू शकतात, तसेच शब्दांचे माध्यमही उपयोगी पडते, हे जसं खरं, तसंच एखाद्याच्या मनामध्ये काय काय विचार चालले आहेत, ते समोरच्याला समजण्याची, ते मनात वाचण्याची एखादी किमया प्रत्यक्षात येईल कां? एकतर्फी प्रेमामुळे निर्माण होणारे एकाहून अनेक भयावह गुन्हे जसे त्यामुळे कमी होतील, त्याचप्रमाणे एकदुसर्याला चाहणारे दोन जीव एकमेकांजवळही येऊ शकतील ! व्यावहारिक जीवनातील अनेक करार बेकरार सुद्धा त्यामुळे होऊ शकतील किंवा अनुकूल करार होण्यासाठी काय करावे तेही उमजू शकेल.

👍"नवनवीन संकल्पना !":
काही वर्षांपूर्वी पूर्वी मी एका मराठी नियतकालिकात 'प्रगतीची क्षितिजे' या नावाचे एक सदर लिहीत असे. त्यामध्ये मी नवनवीन काही संकल्पना सुचवत असे.

💐 मला आठवते जाहिरात व्यवसाय उत्तरोत्तर महत्त्वाचा होत जाईल आणि आपण जे कपडे घालतो त्यावरही जाहिराती छापून, लोक अशा तऱ्हेचे कपडे घालून वावरतील, असे एका लेखात लिहिले होते. आज ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते, जेव्हा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या गणवेषांवर जाहिराती मिरवताना आपण पाहतो तेव्हा.👌

💐 दुसरी एक अफलातून संकल्पना त्या वेळेला माझ्या मनात रस्त्यावरील एकंदर ट्रॅफिक जँममुळे मनात आली होती. (अर्थात आता तर ट्रॅफिक जॅम एवढा भयंकर असह्य झाला आहे.) त्यावेळेला एका लेखात मी कल्पना मांडली होती की, आपण ज्या मोटारीत आहोत ती जर उडवता आली तर किती बहार होईल ! आपोआप ट्रँफिक कोंडीमधून आपण बाहेर पडून, पाहिजे तेथे लवकर आपल्याला जाता येईल. ती त्यावेळेला अक्षरशः वेडगळ कल्पना होती. कदाचित तुमच्याही मनात आजकाल प्रवास करताना तसं काही येतही असेल.👌

👍 "काँलेजच्या एका ब्रेन स्टाँर्मिंग कार्यक्रमात, मी एक अभिनव कल्पना मांडली होती. प्रत्येक वस्तुतील, प्रत्येक अणु ही एखादी सूर्यमाला असावी. केंद्रातील प्रोटाँन म्हणजे एक 'सूर्य व सभोवती गोलगोल फिरणारे ईलेक्ट्राँन हे जणु विविध ग्रह. अंतर हे सापेक्ष असते, ह्या द्रुष्टिकोनाचा मुलभूत विचार करून ही संकल्पना मी मांडली होती. अफाट अगाध अपरंपार, कल्पनातीत आकाराच्या विश्वाच्या पसार्याचा हा एक ढांढोळा होता."👌

👍 गुणात्मक गोष्टी ह्या व्यक्तिसापेक्ष असतात, त्यामुळे, त्यांचे आकलन वस्तुनिष्ठपणे होण्यासाठी त्याना योग्य ते संख्यात्मक रूप देणे, आवश्यक असते. विकास व प्रगतीची दिशा अशा तर्हेच्या रूपावरून मिळते. मी त्या द्रुष्टिने विविध विषयांचे अनुषंगाने अशी गुणात्मक ते संख्यात्मक रुपांतर करण्याच्या पद्धती निर्माण केल्या आहेत:
उदाहरणार्थ.......
# ग्रहबदलानुसार अनुकूल गुण कोष्टक
# Life Achievement Index
# Job Satisfaction Index
# Business Efficiency Coefficient👌

👍"IPO' ची जादू !":

"सध्या नवीन शेअर बाजारात आणणाऱ्या
"IPO-आयपीओ" ची मोठी चर्चा असते आणि "आयपीओ" हा व्यावहारिक जीवनातला एक परवलीचा शब्द झाला आहे. खरं म्हणजे IPO याचा अर्थ "इनपुट- प्रोसेस-आउटपूट" असा आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक व्यवहार, क्रुती ही "आयपीओ" ने नियंत्रित केली जात असते. आपल्याला आपल्या कृतीतून हे काय फळ मिळते हे त्या बदलाची प्रोसेस ठरवत असते.

तसेच 'इनपुट'मधल्या गुणवत्तेचीही आवश्यकता असते, तसंच सर्वात महत्त्वाचे- परिस्थिती कशी आहे, त्यावर प्रोसेसचे व पर्यायाने यश वा अपयश अवलंबून असते. 'आयपीओ' मधली independent & dependent variables ह्यांचा एकमेकातील संबंधांचा संतुलित अभ्यास करून, एखादा असा फॉर्म्युला निघायला हवा, की जो हे वरील दोनही प्रकारचे 'आयपीओ' कायम यशस्वी कसे होतील ते दर्शवू शकेल !
आहे कां असा कुणी संख्याशास्त्रज्ञ अथवा गणितीज्ञ
हे शोधणारा ?" 👌

👍 जीवनात दोन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे कशाने तरी आपण भारावून जाणं आणि दुसरी म्हणजे, आपल्या मुळे, आपल्या कृतीमुळे कोणीतरी भारावून जाणं. या दोन गोष्टी घडत राहिल्या तर आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत राहील. कल्पनांचा मागोवा घेत घेत, नवनव्या हितकारक शोधांचा हा स्वप्नवत् सिलसिला तुमच्याही मनामनात चालत राहू दे.👌

👍 जशी गरज ही शोधांची जननी असते, तद्वतच
कवीकल्पनाही शेवटी प्रत्यक्षात येऊन नवनवे शोध लागतात. कल्पनांच्या ह्या भरारीचा प्रारंभ, जसा छोट्याशा काव्याने केला, तसा शेवटही केशवसुतांच्या या प्रसिद्ध ओळींनी करू या:

💐"स्वर्ग धरेला चुंबायाला,
खाली लवला मजला गमला.
अशा वितरती अत्यानंदा,
ध्वनि ते,
दिड दा दिड दा दिड दा !"💐

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

👍":पसंतीची दाद-१":👌💐 #

 👍"रंगांची दुनिया 👌                                    💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"पसंतीची दाद-१ !":👌💐

# "अरे संसार संसार !":

"पत्त्यांचा संच आणि संसार यामध्ये साम्य असते. पत्त्यांच्या रवीच्या डावात पत्ते जर चांगले आले, तर आपली रमी लागून आपला जय व फायदा होतो. तसंच संसारामध्ये जोडीदार जर मनाजोगता मिळाला, तर संसाराची वाट सुलभ होऊन आनंदी समाधानी संसार होतो. याउलट रमीमध्ये जर पत्ते खराब आले, तर आपण हरतो नुकसान होते, तसेच संसारामध्ये जोडीदार जर मनाजोगता मिळाला नाही, तर संसाराची वाट लागते !"

👍 झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील संवाद.

# "प्रेमाची जोडी !":

"कप आणि बशी ही जोडी प्रेमीयुगुलाचे एक आदर्श उदाहरण आहे. गरम डोक्याचा प्रियकर म्हणजे कप, आणि त्याचे डोके शांत करण्यासाठी असलेली बशी ही प्रेयसी, अशी ती जोडी आहे, कप बशीची एकमेकांना पूरक अशी !"

👍इति दीपू, झी मराठी वरील "उडू उडू झालं" मध्ये !

# "चूक-घोडचूक !":

ज्याचे संभाव्य परिणाम हानीकारक असतात, अशी कृती करणे, म्हणजे चूक होय. चुका करणे हा कदाचित नैसर्गिक स्वभाव धर्म असू शकतो. पण एखादी चूक केल्यानंतर, ती पुन्हा करणे हे सर्वस्वी अयोग्य आणि जणु एक प्रकारचा अपराध मानला जायला हवा. 

चुकांचे पुष्कळदा परिमार्जन काही सुधारणा करणाऱ्या गोष्टी करून होऊ शकते. परंतु एखादी चूक अशी असते, की जिचे परिणाम त्या व्यक्तीला कायम भोगावे लागतात, त्यापासून त्याची सुटका नसते. कारण ती चूक न सुधारता येण्याजोगी असते, जिला घोडचूक असे म्हणतात. सहाजिकच अशा वेळेला आयुष्यभर त्या व्यक्तीला शांती व समाधान मिळणे दुष्प्राप्य असतं !

# "भूमिका" :

माणसाच्या जीवनाचे गुढ कधी उलगडलेले नाही, तो कां जन्माला येतो, त्याचे प्रयोजन काय आणि अमुकच एक काळच त्याने येथे वास्तव्य कां करावे, याचे उत्तर नाही. ही कदाचित शेक्सपीयरने म्हटल्याप्रमाणे "जग एक रंगभूमी आहे" किंवा 'जीवन ही एक रंगभूमी आहे', असं मानलं, तर माणूस दिलेली भूमिका करण्यासाठी फक्त येतो. रंगभूमीवर जसा खलनायक असतो तसाच नायकही असतो, प्रत्येकाच्या वाट्याला जी भूमिका आयुष्यामध्ये येईल, ती ती चोखपणे पार पाडणं एवढंच माणसाच्या हातात असतं नाही कां ?

# "पसंतीची दाद !":

पैसै देताना कोणी हात आखडता घेतला, तर आपण समजू शकतो. पैशाची काळजी सर्वजणच घेतात. पैसा देताना, तो परत कधी येईल याची फिकीर बाळगावी, हेही सहाजिकच असतं. तसेच गुंतवलेल्या पैशावर कितपत परतावा येतो, याचाही विचार करणं स्वाभाविक असतं. कारण अशा देण्यातून जर निर्णय चुकला, तर नुकसान होण्याची शक्यता असते. 

परंतु एखादी चांगली गोष्ट अनुभवली, मग ती वाचल्याने असो, पाहिल्याने असो, वा ऐकताना असो, तर त्याबद्दल पसंतीची देताना, माणसं हात आखडता कां घेतात, हे नवल आहे. कारण इथे दाद देताना, ती देणार्याचे नुकसान तर होत नसते, उलट ज्याला ही दाद दिली जाते, त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि त्या आनंदात दाद देणाराही अगोदरच सामील झालेला असतो, म्हणून तर तो पसंतीची दाद देतो !

तेव्हा जे जे भावेल, आवडेल, मनाला समाधान देऊन जाईल, त्याला केव्हाही रसिक मनाने दाद देत जा !

अखेरीस......

# 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

"भावपूर्ण श्रद्धांजली.":                                             बहुगुणी, बहुपेडी असे बहुरूपी डॉ अनिल अवचट.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👍💐"आनंदाची व्याख्या !":👌💐

आनंदाची व्याख्या सांगताना, डॉ अनिल अवचट यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझी आई पहाटे उठून अंगणात सडा घालायची, घरासमोरचा रस्ता झाडायची आणि मग दररोज वेगवेगळी रांगोळी काढायची. ते बघायला आणि कौतुक करायलाही कुणी नव्हतं. मग ती रांगोळी पुसली जायची. त्याची तिला काही खंत नव्हती.

तिच्यापासून मी एक शिकलो की, एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो, तोच आपला आनंद. बाकी आनंद काही आपल्या हातात नाहीये. कुणीतरी कौतुक केलं पाहिजे, असं काहीही नाही. माझ्यासाठी प्रोसेसमधला आनंद हे महत्त्वाचं आणि तो मला माझ्या आईने शिकवला."

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

धन्यवाद

सुधाकर नातू

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

"कालाय तस्मै नम: !":

 "कालाय तस्मै नमः !":

सध्या जानेवारी महिन्यामध्ये खरोखर मृत्यूचे अक्षरश: थैमान चाललंय असं वाटतंय. एकामागोमाग एक असे कौटुंबिक परिचयातल्या किंवा एकंदर विविध क्षेत्रांमध्ये नामांकित असलेल्या व्यक्ती, एकामागोमाग एक जसे क्रिकेटमध्ये खेळाडू पाठोपाठ आउट होत जातात, तसे एक एकजण या जगाचा निरोप घेत आहेत. त्याचं मला खरोखर कोडं वाटतं.

कारण बघा ना, आता कुठल्या कुठल्या क्षेत्रातली काय काय माणसं नुकतीच गेली ते: सिंधुताई सपकाळ नंतर रामदास कामत, सुधीर दामले, सुनील मेहता, डॉ अनिल अवचट अशी एकामागोमाग एक माणसं गेल्याच्या बातम्या येऊन अक्षरश: थरकांप मनाचा झाला.

माझ्यातरी आठवणीमध्ये अशा तर्‍हेच्या मृत्यूच्या बातम्या एकसारख्या मी कधी ऐकलेल्या नाहीत. कधीमधी दहा-पंधरा दिवसांनी, महिन्याने अशा काही अंतराने नामांकित लोकांच्या वा परिचितांच्या मृत्यूच्या बातम्या यायच्या. तसेच कोरोना काळामुळे नक्कीच पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत माणसं एकामागोमाग गेली हेही खरं आहे. परंतु नांव मिळवलेली वलयांकित माणसे वेगवेगळ्या वयात व निरनिराळ्या व्याधींमुळे अशी एकामागोमाग जाणे, हे गुढ काय, याचा अर्थ काय, याचा मी शोध घेतोय.

साहजिकच मनात खळबळ माजत राहिली आणि कुणाशी तरी बोलावसं वाटत राहिलं. त्याप्रमाणे एका समवयस्क मित्राशी मी बोललो. आमची सकारात्मक चर्चा झाली, एक नवी दृष्टी त्यामुळे मिळाली.
तिचा सारांश असा:
"ह्या प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो, तो कां गेला, कसा गेला त्याच्या मागची कारणं काय? त्यांचं वय वेगळं, त्यांचा जीवनानुभव वेगळा, त्यांनी जीवनात खाल्लेले टक्के-टोणपे वेगळे आणि ते सध्या आजारी होते काय? खरोखरच काय झालं, हे आपल्याला माहिती नसते.

त्यामुळे प्रत्येकाचा काहीतरी पूर्वेतिहास असणार आणि म्हणून कदाचित ही काळ-वेळ आली असू शकते. आता एकामागोमाग इतकी नामवंत मंडळी कां मरण पावली, याचे उत्तर काढणे कठीण आहे. या गोष्टीकडे या दृष्टीने बघायचं की त्या त्या माणसाचं काही ना काहीतरी अनारोग्याचे कारण असणार म्हणून ही वेळ आली, that's it !

आपण ह्यातून धडा काय घ्यायचा तर आपण आपल्या परीने आपलं आरोग्य सांभाळायलाच हवे हा !"

आपल्याला ह्या विचित्र काळातील, अंतर्मुख व्हायला लागणार्या अनुभवाबद्दल काय वाटतं?

धन्यवाद
सुधाकर नातू

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

👍"आगळे वेगळे, हे सगळे !":👌💐#

 👍"आगळे वेगळे, हे सगळे !":👌

# "एक शाश्वत संकल्पना !":

"आई, आईम्हणून कितीही ग्रेट असली, तरी ती सासूम्हणून सुनेबरोबर कशी वागते, त्यावर ती बाई म्हणून कशी आहे, याचा कस ठरतो !"

👍वहिनी बरोबर संवाद साधताना धाकटा दीर आकाशचे बोल. "सन टीव्ही मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेमधील. 

# "इतर प्रगत देशांच्या तुलनेत, टोलसाठी गाड्या थांबवल्या जाणे, हा आपला मागासलेपणाच म्हणावा लागेल.!"

# "अपेक्षांचा भोवरा !":

जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. 

आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. 

व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे.

# Victory Spots !":

"संकटं येतात, तेव्हा आव्हानं निर्माण होत असतात आणि अशा वेळेला, त्यांच्यापासून पळून न जाता, आपण संपूर्ण सामर्थ्यानिशी त्यांचा जर सामना केला व आपल्या जीवनामध्ये ज्याला 'टर्निंग पॉईंट' म्हणतात अशा तरी की उपयुक्त फायदेशीर आणि अंतिमतः आपले हित करणारी अशी संधी निर्माण शकतात. संकटांच्या आव्हानांमधून संधी निर्माण करणं अशा तर्‍हेची जीवन शैली,जीवनपद्धती या अशा फायटिंग स्पिरीट मुळे निर्माण होते. तेच आपल्या जीवनांतील Victory Spots होऊन जातात !"

जाता जाता.....

आता, सरते शेवटी....

# "संभवामी युगे युगे"!:

"आगळे वेगळे, हे सगळे !"

"पुनर्जन्माची, अशीही एक जगावेगळी कहाणी !":

पुराणातले दशावतार आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्या संकल्पनेची तुलना, डार्विनच्या 'सजीवांच्या उत्क्रांती सिद्धांता'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जगमान्य गोष्टीशी करू शकतो.

"संभवामि युगे युगे" हे सूत्र आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. ह्याचाच अर्थ एका जन्मानंतर दुसरा जन्म शक्य आहे हे ध्वनित होते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा असे हे सारे आपले संचित आहे.

जर पुनर्जन्म असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या अगोदरच मृत्यू पावते, तिला पुनर्जन्म मिळण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या तुलनेत ज्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा मृत्यू तिच्या हयातीतच होतो, त्या व्यक्तीला पुनर्जन्मासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार हे उघड आहे. 

आपण येथे "डी एन ए" ह्या मूलभूत सूत्राची कामगिरी लक्षात ठेवली पाहिजे. कारण कुणीही त्याच आई-वडिलांच्या पदरी जन्माला येऊ शकणार हे सत्य यामागे आहे. कदाचित म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभो असं तर म्हणत नसतील?

पुनर्जन्माची अशी ही एक जगावेगळी कहाणी !"

धन्यवाद                                                                    सुधाकर नातू


गुरुवार, २० जानेवारी, २०२२

"शारदोत्सव !": "वाचा, फुला आणि फुलवा !":

 "शारदोत्सव !":                                                       "वाचा, फुला आणि फुलवा !":

# "ऐ जिंदगी गले लगा ले !":
दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी आज आत्ताच "तीन सम्राट' हा पार्थ एम एन् यांचा 'अक्षर' दिवाळी अंक'२१ मधील चित्तथरारक लेख वाचून संपवला. सर्वश्री नडाल, जोकोविच आणि रॉजर फेडरर या, प्रत्येकी वीस वीस ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महान टेनिसपटूंमधील विविध चित्तथरारक टेनिस स्पर्धांमधील रोमहर्षक प्रवास वाचला. या तीनही खेळाडूंची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आहेत तशी, या लेखात अनुभवायला मिळाली, त्याचप्रमाणे त्या
तिघांमधला एकमेकांबद्दलचा आदर आणि एकंदरच मैदानाबाहेर वागण्यामधला सज्जनपणा, शालीनता पाहून ह्या तीन सम्राटांसमोर नतमस्तक व्हायला झाले.

सांगण्यासारखी बाब म्हणजे रॉजर फेडरर हा
स्विट्झर्लंडमधल्या बेझलचा आहे आणि जोकोविचने तर सर्बियामध्ये ७८ दिवस बेलग्रेड शहरातील बॉम्बस्फोटांच्या वर्षावात आपले बालपण काढलेले आहे. तिघांच्याही खेळामधला रसरशीतपणा आणि नजाकत, त्याबरोबरच खेळावरील दुर्दम्य प्रेम, निष्ठा या लेखातून पाहायला मिळाली. खूप खूप काही मिळवल्याचा आनंद या वाचनातून जसा झाला तसा इथे शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या माईंडसेटची जातीवंत स्थिती शब्दात वर्णन खरोखरचकरणे कठीण आहे.

"माणूसच माणसाचा शत्रू वाटावा" अशा भयानक कोरोना महामारीच्या कालखंडात, तसेच सात ग्रहांच्या भेसूर कालसर्पयोगाच्या अंधःकारात,
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लहान थोर परिचित वा प्रसिद्ध माणसांच्या मरणायात्रांच्या एकापाठोपाठ दिवसांगणिक येणाऱ्या काळजाचा ठोका चुकविणार्या बातम्यांच्या कल्लोळात मन विषण्ण आणि सैरभैर झालेले असताना, अंधाराची वाट आता सापडणारच नाही की काय अशी मनाची परिस्थिती असताना, अचानक हे तीन सम्राट असे शब्दब्रम्हात अवतरले आणि जाणवले...
"हा जगाचा शेवट नाही; ऐ जिंदगी गले लगा ले" अशी आशिकी किरणे मनामध्ये चमकून गेली....

# "काव्यविहार !":
मनाने मी अशी उभारी घेतली असतानाच, योगायोगाने डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या "आकाश भाषिते" या पुस्तकातील डॉक्टर अनिल अवचट यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवशी लिहिलेली कविता अचानक वाचनात आली ती अशी:

"कशास आता वाट चालणे......
भरकट फिरूया इकडे तिकडे......
वास घेऊया रानफुलांचा......
निरखूया पक्ष्याचे घरटे.......
काढू आठवण प्रीय जनांची.....
उत्कट रमल्या ह्रद्य क्षणांची.....
आपण झालो झाड जुनेसे......."
तरि अंगावरी नवी पालवी......

# "दिसतं, तसं नसतं !":
नुकताच मी "अक्षर" दिवाळी अंक'२१ यामधील श्री. लोकेश शेवडे यांचा "रोम, बर्लिन आणि हस्तिनापूर" हा लेख वाचला. त्यामध्ये फॅसीझम, मुसोलिनी आणि हिटलर व नाझी प्रव्रुत्तीच्या सगळ्या इतिहासाचा सखोल उहापोह केला आहे. त्यानंतर एकाधिकारशाही वा हुकूमशाही ह्यांबरोबर फॅसिझम् व नाझी प्रवृत्ती यांमधील तुलनात्मक फरक देखील तर्काला पटेल अशा शब्दात वर्णन केला आहे. सरतेशेवटी, सध्या त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशा तर्‍हेचे भाष्य आहे.

हा अंतर्मुख करणारा लेख वाचत असताना, कायम सध्याच्या परिस्थितीशी आपोआपच मनात विचार केला जातो आणि त्यामध्ये साम्य आहे की काय, अशी भावना निर्माण होते. जमले तर हा विचारप्रवर्तक लेख जरूर वाच. म्हणजे कदाचित सध्याच्या वास्तवाचे एक वेगळेच चित्र तुझ्याही नजरे समोर येईल.

# "मुंबईचे षड्दर्शन !":

मुंबईचे षड्दर्शन" ही म.टा. मधील लेखमाला, मी नियमितपणे वाचतो. खास तज्ञांनी लिहीलेल्या प्रत्येक लेखामध्ये, मुंबई, तिच्या नजिकच्या इतिहासावर प्रकाश टाकत, इथे घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर मांडलेली माहिती उत्कंठा पूर्ण आणि उपयुक्त अशीच असते.

काय,काय घडून गेले आणि त्याचे काय परिणाम झाले व पुढे काय होतील अशा पद्धतीचे निरीक्षणही या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये असते. त्यामुळे लेखकांचे अभिनंदन आणि ही अभिनव संकल्पना वाचकांच्या हितासाठी राबविल्याबद्दल म.टा.चे कौतुक व शुभेच्छा. 

म.टा. २३ डिसेंबरच्या अंकामध्ये विचक्षण आणि साक्षेपी अशी कीर्ती असणाऱ्या, संपादक तत्वाचे अनेक पैलू अंगी असणाऱ्या, 'श्रीपु' अर्थात श्री. पु. भागवतांचे 'सत्यकथा' मासिक व मौज प्रकाशनाच्या रुपाने मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे योगदान आहे. 'सत्यकथा' मासिकाच्या संपादनाची मुहूर्तमेढ करून 'श्रीपुं'नी साहित्य विश्वात जे पाऊल टाकले, ते खरोखर वामनावताराप्रमाणे मराठी साहित्यविश्वाला व्यापून गेले. 'सत्यकथे'ने, पुढे नामांकित झालेले अनेकानेक दिग्गज लेखक घडवले ही एक त्या विश्वातील अभिमानास्पद व आनंददायी गोष्ट आहे. तिचा लेखाजोखा साक्षेपी व्रुत्तीने सादर करणारा हा लेख, प्रत्येक मराठी प्रेमीने वाचावा असाच आहे.

त्या लेखातील वेचक व वेधक गोषवारा असा आहे:
"संपादन एक दृष्टी असते, कथा कवितेतील नव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील निर्मितीला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशित करणे, हे संपादकाचे आद्य कर्तव्य असते. मराठी साहित्यवर निरतिशय प्रेम करणारे, लेखकांच्या जडण-घडणीत स्वतःला झोकून देणारे, नवसाहित्य घडवून आणणारे आणि साहित्यिक बांधिलकीचे व्रत घेऊन जाणारे असे संपादक म्हणजे 'श्रीपु' होय.
संपादक हा लेखक घडवतो हे मान्य न करता, प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असे म्हणणारा विचक्षण व साक्षेपी संपादक म्हणजेच श्री पु भागवत !"

सारांश,
ही 'मुंबईचे षड्दर्शन' लेखमाला म्हणजे जणू काही, मुंबईकरांसाठी उघडलेला तिसरा डोळाच म्हणावा लागेल.

धन्यवाद
सुधाकर नातू

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

"मनभावन क्षण-२!": "मातीचा कस आणि पिकाचे वाण !":

 "मनभावन क्षण-२!":                                            "मातीचा कस आणि पिकाचे वाण !":

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" यावरच पुढचं सारं नव्याने सांगतो आहे:
टीव्ही बघताना रात्रीच्या 'प्राइम टाईम'मध्ये पाणी घातलेल्या लांबवत नेलेल्या मालिका कधीकधी बघाव्याशाच वाटत नाहीत. तसा एक तरी मोकळाचाकळा तास रात्रीच्या वेळेला मिळतो असा माझा अनुभव आहे. त्याला मी "गोल्डन अवर" मानतो.

असाच "गोल्डन अवर" आज दुपारी वामकुक्षी घेत असताना मला अवचित गंवसला. दुपारी पोटभर भोजन झाल्यावर कधीमधी बिछान्यावर झोपेची आराधना करता करता, एखादे पुस्तक वा मासिक वाचण्याची माझी नेहमीची संवय आहे.

# "विलक्षण प्रेरणादायी अपूर्व अनुभव !":
तसा आज दुपारी मी "मॅजेस्टिक नेट"च्या दिवाळी अंक संच'२१ भेट" सोबत आलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे 'आकाश भाषिते' हे पुस्तक वाचत होतो. त्यातील प्रत्येक लेख सोन्याच्या विचारांचा व हिरेमाणकांसारख्या अनुभवांचा खजिनाच आहे. हे सारे ललित लेख म्हणजे डॉक्टर साहेबांचे आत्मशोधाचे आत्मनिवेदन असल्यासारखे आहेत.
अजून कोणकोणते लेख वाचायचे राहिले आहेत, ते
अनुक्रमणिकेवर ऊन चाळत असताना अचानक "मातीचा कस आणि पिकाचे वाण" हा आगळेवेगळे शीर्षक असलेला लेख नजरेत आला आणि हा लेख मी तहान भूक व झोप विसरुन अधाशासारखा वाचला. वीज चमकावी, तसा एक विलक्षण प्रेरणादायी अपूर्व अनुभव गंवसल्याचा आनंद मला झाला.

त्या लेखात 'मातीचा कस व पिकाचे वाण' म्हणजे खरोखर काय हे उलगडून टाकता टाकता, 'सु'संस्कार 'कु'संस्कार म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगितलेले जाणवले. 'मनभावन क्षण' शोधत, शोधत तसा अनुभव घेण्याची आपली अंगभूत शक्ती, चांगले असे काय मिळेल ते शोधण्याची आपली रसिक वृत्ती, यांचा केलेला समर्पक उहापोह मनाला पटून गेला.

डॉक्टर साहेबांनी हा मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी बालपणापासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची शिवचरित्रावरची व्याख्याने आणि पुस्तके कसकशी वाचली आणि मनावर झालेला संस्कार, तो अनुभव समरसून कसा घेतला व तिथेच न थांबता त्या अनुभवाचे पृथक्करण करत अधिक माहिती मिळवत, छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तीवैशिष्ट्ये, त्या बिकट काळात, स्वराज्य स्थापन करण्याच्या ध्येयाची पूर्तता त्यांनी कशी केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, राज्यकारभार कुशल प्रशासकासारखा कसा सांभाळला ते मांडले आहे.

ह्या जोडीला महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा मानसशास्त्रीय द्रुष्ट्या अभ्यास करुन "छत्रपती शिवाजी महाराज The CEO" ही द्रुक् श्राव्य मालिका कशी सिद्ध केली -ती 'AVAHAN IPH'
ह्या यु ट्यूब वरील चँनेलवर निःशुल्क उपलब्ध असल्याचा लेखाअखेरी उल्लेख केला आहे.

सहाजिकच दुपारची झोप न घेता मी हे 'मनभावन क्षण' अधिक सम्रुद्ध करण्यासाठी लगेचच चहा पीता पीता डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी परिश्रमपूर्वक सादर केलेला वरील विडीओ you tube वर पाहिला; मी भारावून गेलो, अपूर्व आत्मसमाधान अनुभवले आणि म्हणूनच "ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी" करण्यासाठी, त्याची लिंक येथे पुढे देत आहे:

https://youtu.be/pPu9XY2K_IQ

आपणही लिंक उघडून हा प्रासादिक भाषेतला विलक्षण अंतर्मुख करणारा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पहा. तुम्हाला खूप खूप 'मनभावन क्षण' त्यामुळे मिळतील, अशी मला खात्री आहे.

सारांश काय, छान पाऊस पडला, उत्तम बियाणे लावली, नैसर्गिक खते घातली, तरी येणाऱ्या पिकाचा वाण हा अव्वल असण्यासाठी, मातीचा कस सगळ्यात महत्वाचा ! तसंच माणसाच्या मनाचं असतं, बाह्य कितीही उपचार सोपस्कार केले तरी शेवटी मातीरुपातील माणसाच्या संस्कारशील मनाचा कस सगळ्यात अत्यावश्यक हेच खरे !

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

"नाट्यरंग !": "मुंबईचे षड्दर्शन": "घडविते हात-माधव मनोहर":

 "नाट्यरंग !":

"मुंबईचे षड्दर्शन":
"घडविते हात-माधव मनोहर":

"मुंबईचे षड्दर्शन" हे 'महाराष्ट्र टाइम्स'मधील सदर मुंबईची एकंदर जडणघडण कशी होत गेली, याचा ओझरता आढावा घेत असताना, मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या असामान्य योगदानाने ज्यांनी भर घातली अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा देखील येथे यथातथ्य प्रवास रेखाटला जातो. त्यादृष्टीने हे सदर म्हणजे 'आर्काइव्ह वँल्यू' असलेले ठरू शकेल.

आज दि. १८ जानेवारी'२२ रोजी ह्या सदरात, प्रतिभा मतकरी यांनी त्यांचे पिताजी प्राध्यापक माधव मनोहर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि कौटुंबिक जीवनपटाचा जो लेखाजोखा "नाट्यसमीक्षेचा मानदंड" या लेखात मांडला आहे, तो सर्वच रसिकांनी वाचण्याजोगा आहे.

नाशिकमधील माधवरावांची जडण-घडण आणि तेथील त्यांचे गंगेमध्ये पट्टीचे पोहणे, बी ए झाल्यावर मुंबईला कन्याशाळेत शिक्षक, नंतर एस एन डी टी मध्ये प्राध्यापक, त्यांना एम ए व्हायचा झालेला आग्रह; नाही तर त्यांची गेलेली नोकरी व पुढे पिंगेज् क्लासेसमध्ये त्यांचे शिकवणे, असा व्यावहारिक जीवनपट जसा समोर येतो, तसाच त्यांचे कन्याशाळेत असताना विद्यार्थिनी असलेल्या काशीबाईंबरोबर जुळलेले प्रेम व नंतरचा त्यांचा संसारिक, कौटुंबिक जीवाभावाचा अनुभव या लेखामध्ये प्रतिभाताईंनी सहजसुंदर भाषेत मांडला आहे.

एक उत्तम नाट्यसमीक्षकम्हणून त्यांची कारकीर्द किती असामान्य होती आणि विविध क्षेत्रातील मित्रमंडळी जमवण्याचे त्यांचे कौशल्य व छंद, तसेच रविवारी मुद्दामून फोर्टमधील चित्रपटगृहांना भेट देणे, चांगल्या हॉटेलमध्ये भोजन करणे आणि पुस्तके विकत घेणे हा त्यांचा कार्यक्रम देखील आपल्याला हा माणूस कसा विचारसंपन्न, सांस्कृतिक दृष्ट्या उच्च दर्जाची मूल्ये जपणारा होता, हे जाणवते. लेखा शेवटी मांडलेली दोन तीन वाक्येच त्यांचे सद्ग्रहस्थ म्हणून श्रेष्ठत्व जसे सांगतात, तसेच आता अशी माणसे अनुभवायला मिळत नाहीत, दिसत नाहीत, अशी रुखरुखही आपल्या मनात रुतून बसते.

साहाजिकच माझ्याही माधवरावांसंबधीच्या आठवणी, हा लेख वाचत असताना जागा झाल्या. पट्टीचे पोहणारे प्रा मनोहर आणि माझी पहिली गांठ हिंगण्याच्या महिलाश्रम वसतीगृहातील आमच्या सुट्टीतील वास्तव्यात सुमारे साठ वर्षांपूर्वी झाली त्याचे स्मरण झाले.

त्या निसर्गरम्य परिसरात पोहोण्यासाठी एक
तरणतलाव होता आणि दररोज सकाळी बच्चेकंपनी आणि इतर जण तिथे पोहण्याचा सराव करत असत. मला पोहता येत नसल्यामुळे, तिथे मी शँलो विभागात फक्त पाण्यात डुंबायला जात असे. ते पाहून स्वतः माधवरावांनी मला पोहायला शिकवायचा खूप प्रयत्न केला. परंतु मला ते काही जमले नाही आणि मी त्यांना नको नको असे म्हणत राहिलो. तेव्हा त्यांनी सांगून टाकले "तुला कधीच पोहोता येणार नाही." ही आठवण जागी झाली. अर्थात ते नवल नव्हते. कारण मी अगदी बालपणी माझ्या आजोळी, कोकणात आमच्या विहिरीमध्ये मला माझ्या वयोवृद्ध आजोबांनी पोहायला शिकवण्यासाठी एकदा आत दोरीच्या आधाराने सोडले होते. परंतु दोन अडीच वर्षाचा मी, घाबरून पाण्यामध्ये गटांगळ्या खायला लागलो आणि बुडतो की मरतो की काय अशी वेळ आली होती. अखेर मी वाचलो खरा, परंतु त्या क्षणापासून मला पोहण्याची जी भीती वाटू लागली, ती आजतागायत ! सहाजिकच प्रा मनोहरांसारखे पट्टीचे पोहोणारे, असूनही माझे पोहोणे तसेच आजतागायत अधांतरी राहिले.

दुसरी आठवण, मी देखील माझ्या रंगभूमी वरील प्रेमामुळे, दादरला नाट्यवर्तुळात वावरत असे. नियतकालिकात नाट्यविषयक सदर लिहित असताना, कधीमधी "शिवाजी मंदिर नाट्यग्रुहात माधवरावांची भेटगांठ होत असे. नाटकाच्या मध्यंतरांत, त्यांना सन्मानाने बोलवून रंगपटामागे त्यांच्या कलाकार निर्माते व दिग्दर्शक ह्यांच्यखबरोबरच्या गप्पाटप्पा यांचा मी साक्षीदार होतो. तेव्हा बटाटेवडा व चहाचा, चवीने आस्वाद घेतानादेखील त्यांना मी बघितले आहे. त्यांना मिळणारा नाट्यवर्तुळातील सन्मान व आदर ह्यांचा मी साक्षी आहे.

आमच्या घरात अधून-मधून माझी सौ नेहमी प्रा माधव मनोहरांची आठवण काढते. कारण प्रा मनोहर पिंगेज् क्लासमध्ये, ती बी ए करत असताना तिला शिकवायला होते. कदाचित माझे लेखन उद्योग, मराठीचे प्रेम आणि मराठी वांग्मय व इतर बाबतीतल्या माझ्या तिच्याबरोबरच्या गप्पाटप्पांमुळे
सौ नेहमी मला म्हणते "तुम्ही रिटायर झाल्यावर पिंगेज् क्लासमध्ये, प्रा म़ाधव मनोहरांप्रमाणे मराठीचे प्राध्यापक कां नाही झालात ? माझ्या निव्रुत्तीनंतर हा प्रश्न मला नेहमी तिच्याकडून अधून-मधून विचारला जातो !

प्रा माधव मनोहरांसारखे 'घडविते हात', मुंबईचे सांस्कृतिक, शैक्षणिक जीवन सम्रुद्ध करत गेले. त्या स्मरणजागराला माझा सलाम !

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, १६ जानेवारी, २०२२

"शारदोत्सव": "जावे, कवितांच्या गांवा !:

 "शारदोत्सव":                                                         "जावे, कवितांच्या गांवा !":


आज, रविवार दि. १६ जानेवारी'२२ 'म टा संवाद पुरवणी'मध्ये 'कवितेचे सगे' हा कवि हेमंत गोविंद जोगळेकर यांचा लेख अथपासून इतिपर्यंत एका दमात वाचला. एके काळच्या होतकरू कवीने, प्रथितयश कवी मंगेश पाडगावकर ह्यांच्या बरोबरच्या सहवासाच्या आठवणी-त्याच्या पुरस्कारप्राप्त 'होड्या' ह्या पहिल्याच कवितेपासून सुरू झाल्यानंतर आतापर्यंतच्या, मनमोकळेपणाने फुलवत केलेले हे एक आत्मचिंतन आहे. असे जरी असले तरी, हा लेखक-कवी वाचकांनाही त्याच्या मंगेश पाडगावकरांबरोबरच्या सहवासाचा क्षण अन् क्षण जागवत बरोबर नेतो, हे या लेखाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

ह्या वाचनीय लेखातील शेवटच्या ओळी, प्रस्तुत लेखककवीबद्दल व कविवर्य पाडगावकरांबद्दल देखील खूप खूप काही सांगून जातात, यातच ह्या लेखाचे सार व सामर्थ्य आले ! त्या ओळी अशा:

"पाडगावकरांकडून मला काय मिळाले, असा विचार जेव्हां मी करतो, तेव्हा मायकेल एंजेलोची प्रसिद्ध उक्ति आठवते:

"शिल्प हे दगडात असतेच, मी फक्त ते दाखवण्याचे काम करतो !"
मी कवी होतोच; पण ते इतरांना आणि मलाही दाखवण्याचे काम पाडगावकरांनी केले. हे ऋण न विसरण्याजोगे आहे."

कवितेतून नुसते 'बघे'च नव्हे, तर जीवाभावाचे 'सगे' निर्माण करणाऱ्या, मंगेश पाडगावकरांना जसा माझा सलाम, तसाच हेमंतजींना सुद्धा !

ह्या मनोज्ञ लेखाच्या गारुडांत मी गुंतलो असतानाच मोबाईलवरील, नीलम खानापूरकरांनी* forward केलेली "अभंगवाणी" ह्या 'व्हाँटस् अँप'समुहावरील पुढील कविता* नजरेत आली आणि मी पहाता पहाता ती वाचूनही काढली.

हेमंतजींच्या लेखानंतर ह्या कवितेचा प्रसाद, रविवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी मला मिळणे,
हा एक दुग्धशर्करा सुयोगच नव्हे कां?
ती अर्थपूर्ण कविता म्हणूंनच येथे देण्याचा मोह आवरत नाही:

👍👌💐💐

"टिंब"
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले !

'नदी'चा केला 'नंदी'
'माडी'ची केली 'मांडी'
'बाबू'चा केला 'बांबू'
'कुडी'ची केली 'कुंडी'

'शेडी'ची केली 'शेंडी'
'अग' जाले 'अंग'
'भाडे' बनले 'भांडे'
'रग' बदला 'रंग'

हिंडून हिंडून असे
टिंब अगदी दमले
वाक्याच्या शेवटी येऊन
पूर्णविराम बनले !

👍👌💐💐

(* one response on above poem as rec'd:
"That ‘timb’ Kavita seems to be a forwarded poem."
पण कोणाची कविता आहे ती? ही उत्सुकता माझ्या मनात रेंगाळली. सोशल मिडीयावर सर्फींग करताना ही कविता डॉ निलीमा गुंडी ह्यांची असल्याचे वाचनात आले.)
👍👍
कवितांच्या या आनंद मधुर सोहळ्यात अशा तऱ्हेने मी गुंतत गेलो आणि अचानक मला, माझ्या नोंदवहीतील, मीरा सहस्रबुद्धे# ह्यांच्या 'अंतर्नाद दिवाळी अंक'११ मधील अशाच अर्थपूर्ण दोन कवितांची# आठवण झाली. त्या ह्या लेखाचे शेवटी दिल्या आहेत. काव्यावर प्रेम करणार्या रसिकांनी त्या आवर्जून वाचाव्यात.
👍👍
काव्याच्या ह्या मन धुंद करण्याच्या माहोलात,
नवल की हो घडले !
मलाही ह्या काव्यपंक्ती सुचून गेल्या:

"आगळे वेगळे, 'ते' सगळे !
कुणी हसे वा रुसे,
कुणी फसे वा रडे.
असेच नित्य जग हे चाले
क्षण आले गेले, सारे 'ते' संपले !"

तर अशी आहे ही कवितांच्या गांवातली कहाणी ! 👌💐

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
👍👍💐💐
# मीरा सहस्रबुद्धे ह्यांच्या 
"अंतर्नाद दिवाळी अंक'११:
मधील दोन अर्थपूर्ण कविता:


"अखेरचा ज्ञानी":
पुन्हा अभ्यासली
सारी वर्णमाला
वेगळाची बोध झाला मनी

'अ'काराचे स्थान
आरंभा असे
परी 'ज्ञ' तो वसे सर्वां अंती

आधी अहंकार
ज्ञान ये नंतर
ठेविले अंतर सुज्ञपणे

ज्ञानास नकोरे
अहंतेचा संग
पुरता बेरंग अज्ञ करी

नव्हे अहंकार
धुमसे अंगार
ज्ञान वारंवार शांतवी तया

जीवासवे जन्मे
जरी आधी कुणी
अखेरचा ज्ञानी, लावी दीप.
👍👍👍👍💐💐💐💐


"शैशव":

सानुल्या विश्वात माझ्या बासुरीचा सुर आहे...
जीवनाचा जो विसावा ब्रह्म मी त्यातून पाहे
उमलणारे मुक्त हसणे
सुखवणारे गोड रुसणे

आज त्यांच्या बोलण्याला चंदनाचा गंध आहे
नजर भोळी भुलवणारी
अंतरंगा फुलवणारी
भाबड्या प्रश्नातूनी त्या अमृताचा पूर वाहे...

भास्कराचे तेज ह्यांचे
वैनातेयाची भरारी
चांदण्यांचे स्वप्न सुंदर सोबतीला आज आहे...

पाहिला मी देव येथे
पूजिले निष्पापतेला
घनतमी ह्या जीवनाच्या जागती ही ज्योत आहे....
👍👍👍👍💐💐💐💐

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

👍"नियतीचे अँप लै भारी !":👌🎂#

👍"रंगांची दुनिया":👌

💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐

👍"नियतीचे अँप लै भारी !":👌🎂#

# 👍👍"दाद व दादागिरी !":

"दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.

सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच! "

# "लय भारी !":

सर्व बँक अकाउंटस् एकत्र ऑपरेट करता येतील असे एक भारी ऑनलाईन अँप निघाले आहे..... .. 

पण पण.......                                                          

समस्त जगताला आपल्या तालावर, नाचवणार्‍या नियतीचे अँप मात्र "लय भारी" !

# "जीवनाचा सारीपाट !":

माणसाच्या जाणीवांचे विश्व विस्तारत सम्रुद्ध होत असते ते प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे: एक वाचलेली पुस्तके, दोन आयुष्यात येणारी माणसे आणि तिसरी गोष्ट अवघडलेपणाचे प्रसंग! शेवटी जीवन म्हणजे आंबट गोड अनुभवांचा सारीपाटच तर असते!!

# "संसाराचा सारीपाट !":

"माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. 

आपला संसार सुखाचा करणे, हे अखेर आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो."

# "विकास ?संस्कृती भकास !":

"निवडणूकांच्या प्रचारकी रणधुमाळींत, नेहमीप्रमाणे, भौतिक गतीमान विकासाच्या स्वप्नवत् आश्वासनांची खैरात केली जाईल. पण, नितांत गरजेच्या, सभ्य सुसंस्क्रुत, समंजस समाज निर्मितीचा पाया असलेल्या, वैश्विक मुलभूत नितीमूल्यांचा सर्वंकष प्रचार आणि समस्त जनामनांत द्रुढ, अतुट संस्कार करणे कुणालाच सुचत नाही, हेच खरे दुर्दैव आहे!"

# "चारोळी":

"असंगाशी करता संग,

मदन करील दंग.

घरी वाद, वादंग

संसार होई दुभंग ! "

#👌👌"माझे अध्यात्म !":

* वाचन हा श्वास,

* लेखन हा निश्वास,

* मालिका पहाणे हा ध्यास.

* घडामोडींचा विचार हा अभ्यास,

* सोशल मिडिया वापरणे हा विकास ?

* प्रवास करणे हा त्रास, 

आणि

** आरोग्य राखणे हा प्रयास.

धन्यवाद 

सुधाकर नातू

रविवार, २ जानेवारी, २०२२

"मनभावन क्षण !":

 👍👍👍👍💐💐

"रंगांची दुनिया":

।।रसिकता रुजवूया।।

।।रसिकता फुलवूया।।

।।आनंद घ्या, आनंद द्या।।

👍👍👍👍💐💐

"मनभावन क्षण !":

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" यावरच पुढचं सारं सांगतो आहे:

टीव्ही बघताना रात्रीच्या 'प्राइम टाईम'मध्ये 'पाणी' घातलेल्या, लांबवत नेलेल्या मालिका कधीकधी बघाव्याच वाटत नाही. असा एक तरी तास रात्रीच्या वेळेला मिळतो असा माझा अनुभव आहे. त्याला मी "गोल्डन अवर" मानतो.

रात्रीचा नऊ ते दहा हा माझा हल्ली "प्राईम टाईम" मधील 'गोल्डन अवर" आहे. त्यावेळेला मी टीव्ही चॅनेल सर्फिंग करतो वा अवांतर वाचन. अशा वेळेला, त्या रात्री नवल घडले आणि "एबीपी माझा" वर "माझा कट्टा" या कार्यक्रमात वर्ल्डकप विजेत्या १९८३ सालच्या संघाचे कर्णधार श्री कपिल देव प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या बरोबरच्या गप्पा ऐकत राहणे, हा एक नोस्टँल्जिक अनुभव होता. नुकताच त्या चित्तथरारक विजयावर आधारित, '83' हा रोमहर्षक आणि नाट्यमय चित्रपट मी नुकताच पाहून आल्यामुळे तर त्या पुनःप्रत्यकारी गप्पांची रंगत अधिकच वाढत गेली.

साधेसुधे निगर्वी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या, वागण्यात सहजसुंदरता, प्रामाणिक, पारदर्शक बोलण्यांतून सेलिब्रिटी श्री कपिल देव ह्यांनी ते प्रेरणादायी विश्वविजयी अनुभव गप्पांमध्ये सांगितले. त्या गप्पांतील प्रत्येक अनुभव निश्चितच मार्गदर्शक आणि अंतर्मुख करणारे होता. आपल्या मर्यादा आणि आपल्या आवडीनिवडी यांचे मनमोकळेपणाने वर्णन करणारे कपिल देव, मित्रभावाने सर्वांशी संवाद साधत असल्याने, वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यांची झिबांब्वे संघाविरुद्धची अफलातून विक्रमी १७५ नाबादची खेळी, विश्वकप अंतिम विजयी सामना व आपले सहकारी खेळाडू, त्यांची वैशिष्ट्ये, आपले वैयक्तीक, कौटूंबिक अनुभव त्यातील आईवरील त्यांचे प्रेम, क्रिकेट व्यवस्थापन, IPL बद्दल आणि बदलत्या काळातील अतीक्रिकेटची आव्हाने यांचा देखील त्यांनी परामर्श घेतला. त्यामधील हे बोल त्यांच्या सरळमार्गी Down to earth माणूसपणाचे दर्शन घडवतात:

"कर्णधार म्हणून मी मैदानावर जेव्हा जातो, तेव्हा मी टीमचा सूत्रधार असतो. परंतु मैदानाबाहेर, ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर माझ्या सहकाऱ्यांचे ऐकणारा एक साधा माणूस असतो."

"आपल्या क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूने हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की, आपण देशासाठी खेळतो. स्वतःपेक्षा, देश सर्वोच्च आणि क्रिकेटचे व्यवस्थापन करणारी संस्था ही महत्त्वाची."

" आमच्या वेळी खेळायला जाताना आम्हाला आई-वडिलांची व पालकांची भीती वाटत असे, पण आता उलटे आहे. स्वतः पालकच आपल्या मुलाला घेऊन मैदानात येतात आणि सांगतात याला आयपीएलमध्ये खेळायला मिळेल असे ट्रेनिंग द्या !"

.......

...........

आजच्या काळात कपिलजींसारखा माणूसच विरळा.

इतके त्या रात्री पुरे झाले नाही म्हणून की काय, मधल्या काळात सर्फिंग करताना "सह्याद्री" वरती डॉक्टर विद्याधर ओक व विघ्नेश जोशी यांच्या संगितीक गप्पाही पहायला, नव्हे ऐकायला मिळाल्या. तो सुरेल संगीतसुरांचा मधूर आनंद वेगळ्याच पातळीवर मनाला घेऊन गेला, स्वर्गीय सुखाचा परमानंद म्हणजे काय, ते तेव्हाच जाणवले !

गोविंदराव पटवर्धन यांच्यासारख्या दिग्गजांचा शिष्य असलेले, गोरेपान अत्यंत देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉक्टर विद्याधर ओक, (मला तर रसिकसम्राट रामूभैय्या दाते ह्यांची आठवण आली.) सहजतेने लिलया पेटीवर-संवादिनीवर आपली बोटे अशी सफाईने फिरवत होते की, पावसाची अचानक भिजवून टाकणारी सर यावी, त्यातून निघणारे, सुमधुर सुस्वर ऐकतच राहावे असे होते. 

संवादिनीमधली गोविंदराव पटवर्धन यांची शिकवण, तसेच सुधीर फडके यांच्या कष्टाळू शिस्तीची वैशिष्ट्येही त्यांनी बोलताना उलगडली. वैविध्यपूर्ण नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भावगीत तसेच हिंदी चित्रपटातली गीते अशा विविध इंद्रधनुष्यी सुरांच्या दुनियेत श्रोत्यांना त्यांनी आपल्या संवादिनीच्या किमयेने अक्षरशः चिंबचिंब करून टाकले. असा कार्यक्रम सहसा होणे नाही, तो बघायला मिळाला हे माझे भाग्य आणि त्या अद्भुतरम्य क्षणांची गोडी शब्दात सांगणे मला तरीही अशक्यच !

तो ताल सुरांचा संगीतमय अनुभव पुनश्च तुमच्यासाठी......

ही लिंक उघडा........

अन् नादमय विश्वात धुंद व्हा.....

https://youtu.be/upJPNaNTOMs

नववर्षदिनाच्या रात्री अचानक अवतरलेले हे दोन कार्यक्रम म्हणजे, माझ्या अनुभवविश्वांतले "मनभावन क्षण" कां होते, ते तुम्हालाही मान्य व्हावे! ते इथे मी फक्त वेचले-जागवले इतकेच.

रंग खेळू चला, रंग उधळू चला....

"रंगांची दुनिया" ह्या सप्तरंगांनी फुलत बहरत जावी, हीच सदिच्छा !...

धन्यवाद.

सुधाकर नातू

२/१/२०२२