बुधवार, ३० जानेवारी, २०१९

"अबीर गुलाल'-संस्मरणीय अनुभव.":



"अबीर गुलाल"

कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.


मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप
आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!


हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.


त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. . बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे.


खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे!


मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे.



सुधाकर नातू, माहीम मुंबई १६
Mb 9820632655

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

"तिला काही सांगायचय"-एक गंभीर संशयकल्लोळ!:


 "तिला काही सांगायचयं":एक गंभीर संशयकल्लोळ!:
एका तसबिरी वरून सुखवस्तू अशा एका दांपत्यामध्ये संशयाचे बीज कसे रोवले गेले आणि त्यातून हलकेफुलके संगीतमय असे नाट्य "संशय कल्लोळ" ह्या गाजलेल्या नाटकामुळे आपल्या परिचयाचे झाले आहे. परंतु तिथे केवळ दोन पात्रेच नव्हती तर इतरही अनेक पात्रांचा त्या नाटकात समावेश होता. परंतु हे नवे कोरे श्री. हेमंत एदलाबादकर लिखीत व दिग्दर्शित"तिला काही सांगायचय्" नाटक केवळ दोन तरुण व्यक्तींचे आहे. सहाजिकच केवळ नावावरूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेले हे नाट्य उत्तरोत्तर रंगत जाते.
 "तिला काही सांगायचंय" हे नाटक
"झी मराठी" तर्फे सादर केलेले आहे. तर निर्मिती श्री. चिंतामणी थिएटर्सची आहे. "चारचौघी" सारखी चाकोरीबाहेरची नाट्ये सादर करणार्या ह्या नामवंत नाट्यसंस्थेची, नेहमीच विचार प्रवर्तक आणि सामाजिक कौटुंबिक समस्या ऐरणीवर आणणाऱ्या नाटकांची परंपरा आहे. रसिक त्यांचे उत्तम स्वागतही करतात. त्यातून "झी मराठी" सारख्या मीडियातील अग्रगण्य संस्थेचे पाठबळ मिळाल्यामुळे या नाटकाची जाहिरात अतिशय उत्कंठापूर्ण व अनोखे रहस्य प्रकट करणारी होती. सहाजिकच हे नाटक पहाणे क्रमप्राप्त होते.
लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच जाणार्या ह्या कलाक्रुतीमध्ये केवळ नायक व नायिका अशी दोनच पात्रे दिसतात. अर्थात्  फक्त दोन पात्रे असलेली नाटके मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. "आरोप" हे त्यातले एक प्रमुख रहस्यप्रधान नाटक. तर दुसरे "संकेत मिलनाचा" असे कुतूहल जाग्रुत करणारे.  दरवर्षी एका ठराविक दिवशी विभिन्न जोडीदार असलेल्या विवाहित स्री व पुरुषाने पंचवीस वर्षे, एकत्र एकाच ठिकाणी भेटून हितगूज करायचे, अशा त्यावेळच्या काळाच्या पुढच्या, अद्भुत संकल्पनेवर बेतलेले हे नाटक पूर्वी विलक्षण गाजले होते. तर त्याच धर्तीवर त्या नाटकाची जागा एका वेगळ्या पद्धतीने घेणार्या नवविवाहित जोडप्याचे असलेले "तिला काही सांगायचय" हे नाटक रसिकांनी पाहण्यासारखे आहे.
"ती" आणि "तो" ह्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच्या रात्री, त्यांचा एकमेकांमधला रंगत जाणारा व रहस्य निर्माण करत रहाणारा संवाद, असे या नाटकाचे थोडक्यात स्वरूप आहे. पण प्रसंग आणि संवाद अशा खुबीने रंगवत नेले आहेत की, त्यामधून  दोघांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीची प्रेक्षकांना हळूहळू कल्पना येत जाते आणि तिथेच नाटकाचे यश आहे.

कोणत्याही नवपरिणीत जोडप्यांचे एकमेकांतील भावबंध हे परस्परांना नीट समजून उमजून घेऊन त्यांच्या गुणदोषांसकट जेव्हा स्वीकार होतो तेव्हाच ते अधिक चांगले बनतात. पण संशयाचे भूत आणि त्यातून आपला जोडीदार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नादी लागून आपल्याला फसवतो आहे असे काही ढग जर निर्माण झाले तर त्यातून प्रक्षोभ भांडण वितंडवाद, प्रसंगी फारकत हा वास्तव परिणाम असतो.
एकमेकांतील खेळकर संवादातून हे जोडपे रंगमंचावर, संशयाच्या पुलावरून पहाता पहाता प्रेमाकडून विद्वेषाकडे, सुसंवादाकडून विसंवादाकडू कसे वहावत जाते ते पहाणे, हा एक ह्रदयाची धडधड वाढविणारा जीवंत अनुभव आहे. एकमेकांच्या वागणुकीबद्दल संशय घेत ते अशा बिंदूला येऊन पोहोचते की वर्षाचा विवाह चा वाढदिवस साजरा होतो की नाही अशीच शंका निर्माण व्हावी. "ती"ची भूमिका समर्थपणे पेलली आहे तेजश्री प्रधान (अर्थात "होणार सून मी ह्या घरची" मधली जान्हवी) आणि" "तो" झाला आहे, तिला सडेतोड उत्तरे देणारा आणि प्रसंगी अभिनयाच्या क्षेत्रात उजवा वाटणारा आस्ताद काळे (अर्थात सरस्वती मालिकेतील मोठे मालक!)
एकमेकांच्या चारित्र्यावरून घेतलेल्या संशयाचे भूत परमोच्च बिंदूला, ती जेव्हा बोलू लागते आणि रहस्यामागून रहस्ये उलगडतात  तेव्हा धक्क्यावर धक्के बसत जातात. पुढे काय होते, सत्य काय असते अन् शेवट काय कसा होतो हे पहाण्यासाठी नाटकच प्रत्यक्ष पहायला हवे.
सुधाकर नातू


सोमवार, २१ जानेवारी, २०१९

"आरण्यक"-एक अंतर्मुख करणारे तत्वज्ञान":



"नाद, हा खुळा!":
एखादी गोष्ट जेव्हा आवडते आणि तीच तीच करावीशी वाटते त्याला कुणी नाद असे म्हणतात. ह्याला नाद लागला, तर कोणी खूळ लागलं असं म्हणतात! नाद न म्हणता, मी तर ह्याला खूळ असंच म्हणतो आणि मलाही असंच एक खुळ, तरुणपणापासूनच लागलेलं आहे. ते म्हणजे चांगलं वाचायचं, नाटक सिनेमा बघायचं!

हे माझं खुळ, चांगलं का वाईट ते ज्याचे त्याने ठरवावे, पण त्याचा एक फायदा मात्र मला आता निवृत्तीनंतर खूप खूप होतो आहे. वेळ जायला तर ते खूळ हे साधन होतं, परंतु त्याचबरोबर विचारांना चालना देत, मेंदू ताजातवाना राहतो. काय घडतयं, कुठे काय होतंय, त्याचीही जाणीव त्यामुळे होते व कुणाचं आयुष्य कसं काय काय भोगत गेलं तेही उमजतं. त्यामुळे माझं हे खूळ असंच चालू राहणार आहे.

पण गोष्ट इथेच थांबत नाही, याच्यापुढे अजून एक खूळ लागले आहे. ते म्हणजे कधी काही चांगलं वाचलं, तसं पुस्तक मिळालं, विचार करावा असं नाटक किंवा सिनेमा बघायला संधी मिळाली तर, त्यानंतर जे काही मनात उपजेल, ते एखाद्या टीपकागदासारखे शब्दात पकडून (कागदावर पूर्वी), पण आता मोबाईलवर उतरवायचं खूळ मला लागले आहे.

तशी माझी लिखाणाची सवय होतीच. पूर्वी कागदावरचं होतं आणि अनेक मासिकांमध्ये माझे लेखही छापून यायचे. पण आता जे समाधान मिळते, ते तसं पूर्वी मिळत होतं असं नाही, कारण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मला व्हाट्सअप वर किंवा फेसबुकवर हे खूळ हजारो लोकांबरोबरही शेअर करता येतं! तेही एका क्लिकने, क्षणार्धात!

आणि हे असंच चालू राहणार आहे. ह्या पूर्वी,
"ऋतुरंग" दिवाळी अंक"१८: ची रसास्वादवजा ओळख मी तुम्हाला करून दिली होती. आता एक नाटक नुकतच बघितलं व त्या अनुभवांचं, माझ्या मनावर उमटलेले चित्र पुढे पाठवत आहे. ते गोड मानून घ्या:

"आरण्यक"-अंतर्मुख करणारे तत्वज्ञान":

दादरच्या यशवंत नाट्यमंदिरात काल "आरण्यक" नाटक बघितले. खूप दिवस ह्या नाटकाच्या मुंबईतील प्रयोगाची प्रतीक्षा करत होतो. महाभारतातील शेवटच्या पर्वाची ही एक ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. हे नाटक सुमारे तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर होऊन चांगले नाव मिळवून गेले होते याचीही कल्पना होती. त्यामुळे मुद्दामून ज्या दिवशी तिकीट विक्री सुरू होत होती, तेव्हाच जाऊन तिकीट काढले त्यामुळे जागाही हॉलमध्ये अतिशय चांगली मिळाली.

ह्या नाटकामध्ये रंगभूमीची आयुष्यभर ज्यांनी अहर्निश तपस्या केली आहे, अशा आदरणीय व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे. स्वतः लेखक दिग्दर्शक श्री. रत्नाकर मतकरी, चिमणराव म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले चतुरस्त्र आणि अष्टपैलू कलावंत श्री. दिलीप प्रभावळकर( विदूर) आणि ज्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि भरदार आवाजामुळे तसेच विलक्षण आत्मविश्वासामुळे येईल ते काम चोख करणारे रवी पटवर्धन( ध्रुतराष्ट्र), ह्यांच्याच बरोबर श्रीमती प्रतिभा मतकरी (गांधारी) आणि श्रीमती मीनल परांजपे (कुंती) असे रंगभूमीवरचे जानेमाने कलाकार पुनश्च ह्या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हा एक मोठा दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. जोडीला नव्या पिढीतले श्नी. नकुल घाणेकर (धर्मराज) आणि श्री. विक्रम गायकवाड(सुत्रधाराप्रमाणे असलेला प्रतिहारी) आदी कलावंत. अशा समूहाचे महाभारतासारख्या पुराणातल्या कथेवर नाटक बसवायचे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. अनुरुप असा रंगमंच आणि त्यावरचे देखणे अनुरूप नेपथ्यदृश्य, दोन प्रकारचे आणि दोन खंडात आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. 

पहिल्या खंडात राजाचा महाल, तर दुसऱ्या खंडात वटवृक्षाच्या छायेत असलेला अरण्याचा माहोल ह्या पार्श्वभूमीवर, सव्वा दोन तास जे अद्भुतरम्य नाट्य रंगमंचावर उलगडत गेले, ते रसिक प्रेक्षकांनी अगदी श्वास रोखून पाहिले.
समानमानसी रसिकजनांच्या समूहामध्ये बसून अशा तऱ्हेचे जीवननाट्य, ज्यामध्ये महाभारताची ओझरती अशी शोभादर्शकासारखी कहाणी नजरेसमोर आपोआप उलगडत जाणे हे अनुभवणे खरोखर जगावेगळे आणि आनंददायी असते.  हा संस्मरणीय अनुभव या नाटकाने आम्हाला दिला आणि पाचशे रुपये असा तिकिटाचा चढा दर असूनही तो जास्त आहे असे म्हणूनच बिलकुल वाटले नाही. आणि आपल्याला पुरेपूर मिळाले, असे समाधान वाटण्याइतके हे नाटक उच्च दर्जाचे होते. प्रत्येक पात्राचा सहभाग, चपखल हालचाली आणि कठीण असलेले पद्यमय संवाद स्मरणात ठेवून म्हणणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. तसेच ह्या सगळ्या समूहाकडून योग्य प्रकारे समन्वय साधून नाटकाचे हे सबंध प्रारूप सिद्ध करणे हे तर महाकर्म कठीण.

महाभारतातला अती भेसूर नरसंहार झाल्यावर महाभारतातलं महायुद्ध संपले आहे. सारे शंभर कौरव धारातीर्थी पडलेले आहेत एकटा एकशे एकावा कौरव युयुत्सु भ्रमिष्ट होउन जखमांनी विव्हळत आहे आणि धर्मराजाचे राज्य सुरू झाले आहे, अशा कालखंडात हे नाटक सुरू होते. जे धारातीर्थी आपले बंधू गतप्राण झाले त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून धर्मराजा करवी योग्य ते संस्कार विधी, दानधर्म पार पडल्यानंतर विदुर धृतराष्ट्र गांधारी व कुंती ह्यांनी सर्वसंग परित्याग करून अरण्याची वाट धरली आहे आणि अरण्यातच त्यांचा अंत होतो असे चित्र रंगवणारे हे नाटक आहे.

इथे माणसाच्या जीवनातील कडू गोड रंग,  नात्यांमधले गुंते आणि जीवनातील विविध प्रकारची परस्परविरोधी मुल्ये ह्यांचे द्वंद्व अशांचा ऊहापोह होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाचे आयुष्य हे खरोखर चमत्कृतीपूर्ण अशी कादंबरीच असते. कुणी पहाता पहाता रावाचा रंक होतो तर कधी रंकांचा रावही होऊन जातो असे वास्तववादी अशाश्वतेचे जीवन चित्र आपल्यासमोर उभे राहते. महाभारतातील लोकविलक्षण अशा परिस्थितीचा आणि सद्यस्थितीचा एकमेकांमधील संबंध आणि मतितार्थ आपोआपच मनात वादळ निर्माण करत राहतो. त्या दृष्टीने एक संपूर्ण वेगळे रंगतदार आणि जीवनाकडे पाहण्याची निर्लेप बुद्धी देणारे हे नाटक जे ह्या समूहातर्फे मोठ्या दिमाखात सादर झाले आहे.

जाता जाता अगोदर ज्ञात नसलेल्या अशा काही गोष्टी मला या नाटकात आढळल्या. पहिली म्हणजे, आपण आत्तापर्यंत शंभरच कौरव आहेत असेच समजत होतो, पण एकशे कावा युयुत्सु होता ही गोष्ट. ज्या गांधारीने विवाह होताक्षणी आपला पती आंधळा आहे हे समजताच, पतिव्रता ह्या न्यायाने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली,  ती पट्टी, अरण्यवासात काढून टाकते, ही दुसरी गोष्ट आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे दूर पश्चिमेला समुद्रकाठी द्वारका स्थापन करून यादवांचे राज्य निर्माण करणारा भगवंत श्रीकृष्ण तिकडे हस्तिनापूरच्या जवळपासच्या जंगलात येऊन एका व्याधा तर्फे मारला जातो ही तिसरी गोष्ट. ह्या तीन घटना अथवा गोष्टींची सत्य स्थिती जाणणे हे काम आपण इतिहास संशोधकांवर सोडून देऊ शकतो. अथवा कदाचित ज्याला आपण क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतो ती येथे घेतली गेली, असे समजून तिच्याकडे दुर्लक्षही करू शकतो.

ह्या कलाक्रुतीचे आज गावोगावी रसिकांसमोर धुमधडाक्यात प्रयोग होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ह्या नाटकातील बरेचसे प्रमुख कलाकार वयोवृद्ध तपोवृद्ध असूनही ज्या जिद्दीने आणि तन्मयतेने आपल्या भूमिकेशी एकरूप होऊन नाटक सादर करतात, हे पाहून त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेची आपल्याला कल्पना येते आणि आपण खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा. अनेक दिवसांनतर एक अंतर्मुख करणारा जातीवंत नाट्यप्रयोग बघायला मिळाला याचे समाधान लाभले, हे आमचे अहोभाग्य!

सुधाकर नातू, माहीम मुंबई १६
Mb 9820632655



माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

'ऋतुरंग' दिवाळी अंक"१८: "आशावादी बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!::


ऋतुरंग' दिवाळी अंक"१८: "आशावादी बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!:: 

"काय काय सांगू, कसं बरं सांगू"!

तुम्हाला काय सांगू आणि काय नाही असं मला होऊन गेलेले आहे. काही दिवस असे उगवतात की, एखाद्या मिडास राजाला जसं हात लावीन तिथं सोनं व्हायचं, तसं मला नाटक सिनेमा आणि वाचन ह्यात जे काही समोर येईल ते अत्यंत उत्कृष्ट अविस्मरणीय असते. ह्या आनंदयात्रेची रूजूवात "परफेक्ट मर्डर" या नाटकाने झाली. त्यानंतर "तिला काही सांगायचंय!", ह्या नाटकाने तिच्यावर कडी केली. पुन्हा हे पूर्ण नाही म्हणून की काय त्यानंतर पाहिलेला "भाई" हा चित्रपट आम्हाला दोघांना खूप खूप आवडला.

हे त्यासाठी मी म्हणतो की माझी पत्नी नेहमी नाटक किंवा सिनेमा ला गेली की पुष्कळदा बराच वेळ झोपून जाते. मात्र हा असा पहिला चित्रपट कदाचित खूप दिवसांनी असेल की, ज्यात ती क्षणभरही झोपी गेली नाही व खरोखर तिला इतका आवडला की त्याचा पुढचा भाग कधी येतो याकडे आम्हा दोघांचे लक्ष लागले.

बरं एवढं झाल्यावर नंतर, वाचनाच्या बाबतीत सुद्धा दोन अशा काही गोष्टी समोर आल्या की त्यामुळे माझ्या आनंदाला, समाधानाला पारावार उरला नाही. Just out of the World, अशा अदभूत अवस्थेचा मला अनुभव आला. पहिलं वाचनासाठीचं पंचपक्वान्न "The Week Anniversary Double isdue" च्या रूपात आले! तर त्याच्यावर कळस "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८ ने चढविला.

हा खरोखर कमालीचा असा दुग्ध शर्करा योग होता म्हणूनच मी म्हणतो की मला काय सांगायचं आणि काय काय तुमच्यापुढे मांडायचं असं होऊन गेलं आहे. इतक्या लांबलेल्या नमनानंतर, मी ऋतुरंग ह्या अंकाविषयी माझ्या मनात जे काही तरंग उमटले ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही न विसरता वरील दोन्ही अंक मिळवावे आणि जरूर वाचावे असे मला प्रारंभीच सांगावेसे वाटते.
"ऋतुरंग हा दिवाळी अंक"१८:
"आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे
बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!:

मुळातच "ऋतुरंग" हा दिवाळी अंक नेहमीच इतरांपेक्षा वेगळा असतो. त्याचे संपादक श्री.अरुण शेवते हे खरोखर अत्यंत कल्पक ग्रहस्थ आहेत. दर वर्षी एखादी नवीन संकल्पना मांडून त्यावर अनेक संबंधित दिग्गजांचे लेखन ते आपल्या दिवाळी अंकातून गेली पंचवीस वर्षे प्रसिद्ध करत आहेत. त्यानंतर त्याचे पुस्तकरूपाने जतन करण्याचाही त्यांचा शिरस्ता अनुकरणीय आहे. "नापासांची शाळा" अशासारखे नामवंतांचे नापास होण्याचे अनुभव हे अशाच एका दिवाळी अंकाचे पुस्तकांतले रुप हे वानगीदाखल दिलेले उदाहरण. ह्या वेळेस अंकासाठी त्यांनी जी संकल्पना घेतली आहे ती खरोखर लोकविलक्षण आणि चित्तथरारक अशीच आहे.

"बीज अंकुरे अंकुरे" ही ती संकल्पना आहे, तिचा मतितार्थ, नवनिर्मिती कशी केव्हां निर्माण होते, तिच्याकरीता बीज निर्माण होणं आणि त्याचं फळ लाभणं ह्या मध्ये पुष्कळ काळही जाऊ शकतो हे आपल्या सगळ्यांनाच आपआपल्या जन्मावरून अनुभवाचे आहे. साधे विचार आणि कल्पना ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या मनात अनेक प्रकारची स्पंदने निर्माण होत असतात, आपण अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो, त्यातून आपल्या मनात विचार निर्माण होतात, परंतु त्या विचारांना नीट आकार देऊन काहीतरी मूर्त स्वरूपात जगापुढे आणणं, मांडणं म्हणजे कल्पना होय. थोडे विषयांतर म्हणून सांगतो-नाट्यदर्पणच्या कल्पना एक आविष्कार अनेक ह्या गाजलेल्या एकांकिका स्पर्धेची आठवण होते. टबमध्ये स्नान करणार्या आर्कीमिडीजला, अचानक सुचलेल्या तरंगणार्या वस्तुंविषयीचा जगप्रसिद्ध सिद्धांताची गोष्ट आठवा, म्हणजे नवनिर्मिती व तिचे बीज कसे काय अद्भुतरम्य रीतीने अवतरते, ते समजू शकेल।

ह्या वाचनीय अंकामध्ये अनेक मंडळींनी त्यांचे कल्पना ते प्रत्यक्ष आविष्कार ह्या चित्तथरारक प्रवासाचे अनुभव दिलेले आहेत. ते इतके विविध आहेत, की आपल्या भावविश्वापुढे जणू काही भगवंत श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनासारखे काहीतरी निर्माण होते. प्रत्येकाचा बीजनिर्मितीचा आणि त्यातून उत्कर्ष होणाऱ्या कलाकृतीचा अविष्कार वाचत असताना आपल्याला जो आनंद समाधान आणि तृप्ती लाभते ती शब्दातीत आहे, असे मला तरी अनुभवास आले. मी अक्षरशः भारावून गेलो. अधिक पाल्हाळ न लावता, आता थोडक्यात दिवाळी अंक ऋतुरंग नावाला अगदी चपखल असे निसर्गाचे सहाही ऋतूंचे जणू व्यावहारिक जीवनातील अद्भुत भावतरंग आपल्याला कसे मांडलेले दिसतात ते संक्षिप्त रूपात सांगतो.

आपल्याला जे जमतं,जे करायला आवडतं, ज्यातून आपल्याला खरोखर आंतरिक समाधान मिळतं, असं जेव्हा माणसाकडून सातत्याने घडत जातं तेव्हा अतिशय सुंदर निर्मिती होऊन जाते. पण आपल्याला खरोखर हे असं काय आवडतं ते शोधण्याच्या धडपडीतूनच त्या निर्मिती साठीचे बीज उत्पन होते, हेच मुलभूत तत्व येथे ज्याने त्याने उभे केले आहे. त्यायोगे विविध क्षेत्रांतील बारकावे तपशील अडचणी व आव्हाने आपल्यासमोर उलगडत जातात.

"रेषामैत्री":
डॉक्टर आनंद नाडकर्णी हे विख्यात मानसरोगतज्ञ डॉक्टर, पण त्यांची रेषामैत्री अर्थात रेखाचित्रे काढण्याची आवड कशी केव्हा जोपासली गेली आणि त्यातून त्यांना कसकसा आनंद मिळत गेला ते वाचणे, त्यांची रेखाचित्रे पहाणे, खरोखर मोलाचे आहे आणि नवलाचे आहे.

"पूर्णब्रह्म":
एका विमान प्रवासात ह्या लेकुरवाळीला शाकाहारी भोजन न मिळाल्यामुळे जवळजवळच २४ तास उपाशीपोटी राहायला लागते आणि त्या अपमानास्पद अनुभवातून तिच्या मनात, अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचे "पूर्णब्रह्म" असे अनुरूप नांव असलेले हॉटेल निर्माण करण्याची उर्मी आकाराला येते. त्याकरता किती कष्ट, कुणाकुणाची साथ आणि काय काय करायला लागते, ते "आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना" ह्या लेखात जयश्री कंठाळे ह्यांचे मनोगत मानसी होळेहुन्नुर ह्यांनी सहजसुंदर शैलीत मांडले आहे.

"पिस्तुल्या":
आज "सैराट" चित्रपटा द्वारे घरोघरी पोहोचलेला आणि सर्वाधिक उत्पन्न निर्माण करणाऱ्या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून नांवारूपाला आलेल्या नागराज मंजुळेचे, चित्रपट क्षेत्रातील बीजरोपण "पिस्तुल्या" ह्या त्यांच्या लघुपटाने कसे झाले ते शब्दांकित केले आहे, सविता दामले ह्यांनी. त्याकरता शब्दांकन केलेले, नागराज यांना किती उपद्व्याप व आटापिटा करायला लागला आणि अत्यंत अपुऱ्या साधनांद्वारे त्यांनी पहिल्याच पदार्पणात "पिस्तुल्या" सारखा तळागाळात शिक्षणप्रसार करणारा सर्वोत्तम ठरलेला राष्ट्रीय पारितोषक पुरस्कर विजेता लघुपट कसा निर्माण केला, ते अनुभवणे प्रेरणादायी आहे. असामान्य कलाकार किंवा कलावंत कसा घडत जातो, हे आपल्याला ह्या जिद्दीच्या अनुभवावरून समजते.

"झिपर्या":
आज दूरदर्शन वर उत्तम टीआरपी मिळवून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या "माझ्या नवऱ्याची बायको" ह्या मालिकेचा दिग्दर्शक केदार वैद्य याची "२४" वर्षानंतर ही कहाणी खरोखर विचार करायला लावणारी आहे अरुण साधूंच्या कादंबरीवर झिपऱ्या हा चित्रपट केदारला २४ वर्षापूर्वी सुचला होता, पण तो प्रत्यक्षात यायला मधला धडपडीचा आणि स्वतःला मनोरंजन क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा काळ कसा जावा लागला आणि नंतर हा चित्रपट त्याने कसा निर्माण केला ही कहाणी या सविता दामलेंनी शब्दांकीत केलेल्या लेखात आहे.

"इदं न मम":
सगळीकडे ताणतणाव महाराष्ट्र आणि त्यापोटी प्रसंगी आत्महत्या असे चित्र असताना एक माणूस त्याच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी प्रत काय ठरवतो आणि ते प्रत्यक्षात कसे आणतो ते डॉक्टर अविनाश सावजी यांच्या माणसे घडविणाऱ्या उभे करणाऱ्या शेताच्या मशागती वरून श्री दिनेश गुणे यांनी मांडले आहे. अडचणींना संकटांना प्रसंगी रंगांना सोंग मध्ये जगण्याची उर्मी निर्माण करणाऱ्या या अवलियाचे प्रेरणादायी कर्तृत्व खरोखर कुठेही न सापडणारे आहे. प्रत्येक दिवस काहीना काहीतरी समाजासाठी उत्तम योगदान घडवणारा घालवायचा असे पन्नासाव्या वर्षी ठरवणार्‍या अविनाश सावजींच्या "सेवांकुर" "प्रयास" आणि "लिटल चँम्पस्" ह्या तीन संस्थांना सलाम!

"आदर्श कायापालट":
"माझे दत्तक गाव मोरया चिंचोरे" ह्या लेखातून "यशवंत सामाजिक प्रतिष्ठान" नेवासा येथील प्रशांत गडाख-श्री. यशवंतराव गडाख ह्यांचे सुपुत्र- त्यांनी एका छोट्याशा खेड्यात परिपूर्ण असे तंटामुक्त, स्वयंपूर्ण आणि नितीमत्तेला प्राधान्य देणारे प्रमाण मानणारे आदर्श गाव कसे उभे केले हे या लेखातून आपल्या समोर येते. ही अशीच आमुलाग्र बदलाची लाट जर देशात खेडोपाडी आली तर आपला देश खरोखर सुजलाम सुफलाम आणि जगामध्ये सगळ्यांचे नेतृत्व करणारा होईल यात वाद नाही.

"काळोखातून प्रकाशाकडे":
रॉबर्ट फ्रॉस्ट या जगविख्यात अमेरिकन कवीचे तितकेच जगन माननीय काव्य आणि त्या काव्यनिर्मिती ची कहाणी आपल्यापुढे विजय पाडळकर पाडळकर यांनी "काळोखातून प्रकाशाकडे" या लेखातून मांडली आहे:
त्या जगप्रसिद्ध काव्याचा शेवट:
"-But I have Promises to keep,
-And miles to go before I sleep,
-And miles to go before I sleep.
प्रत्यक्ष जीवनातील एका विचित्र अनुभवातून जी वेदना निर्माण होते, तिचे चक्क १७ वर्षानंतर अशा प्रेरणादायी काव्यात रूपांतर कसे होते ते ह्या लेखातून अनुभवणे खरोखर अविस्मरणीय. त्या काव्यात दुर्दम्य आशावाद निर्माण करण्याची ताकद आहे.

"वाचाल, तरच वाचाल":
शुभम साहित्य-( राजेंद्र ओंबासे), अक्षरधारा-(रमेश राठिवडेकर), आणि उत्कर्ष प्रकाशन( सु.वा.जोशी) ह्यांच्यासारख्या विचारांची जीवनानुभवांची ज्ञानगंगा महाराष्ट्रातील घरोघरी पुस्तक प्रदर्शनातून पोचविणाऱ्या प्रकाशन संस्थांचे हे तीनही मालक कोणे एके काळी अतिसामान्य असे जीवन कसे जगत होते, वेळप्रसंगी हमाली वा पडेल ते काम करून ह्या माणसांनी, प्रतिकूल परिस्थितीत संकटांमधून मार्ग काढत शून्यातून विश्व उभे करत, आज नांवारूपाला आलेल्या आपआपल्या प्रकाशन संस्था कशा निर्माण केल्या, त्याचे वर्णन प्रत्येकाने, आपल्या स्वानुभवावरून पारदर्शक रीतीने आणि प्रांजळपणे मांडले आहे. ही अशी माणसे जर "नाही रे" मधून असे सोन्यासारखे यश मिळवतात तर आपल्यासारख्या सर्व गोष्टी अनुकूल असताना आपण खरंच काय करतो, काय साधतो, असा यक्षप्रश्न आपल्या मनात घर करून जातो. त्यामुळे खरोखर आपलीच आपल्याला लाज वाटू शकते.

"मुळ्येकाकांचे संमेलन":
कायम पांढऱ्याशुभ्र विषयात असलेले नाट्यवर्तुळात चोख व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. अशोक मुळे कसे जगावेगळे अवलीया आहेत ते आणि त्यांना जे वाटते जसे वाटते ते स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणून त्या आगळ्या वेगळ्या संमेलनांद्वारे कसे सिद्ध करतात त्याचे प्रत्यक्ष दर्शन एका लेखात आपल्याला इथे घडते. "माझा पुरस्कार", "कलाकारांच गुढीपाडवा" "एकत्र कुटूंब-सुखी कुटुंब", ज्येष्ठ कलाकारांचे "भेटीलागी जीवा", "असेही एक साहित्य संमेलन"-ज्यामध्ये मुळ्येकाकांनी "ऋतुरंग"चे संपादक श्री.अरुण शेवते ह्यांना समेलनाध्यक्ष म्हणून बोलविण्याचे औचित्य दाखवले होते. असे निर्लेप मनाचे गुणवंतांना शोधून त्यांना यथोचित दाद देण्याचे औदार्य व सौहार्द दाखविणारे आणि तितक्याच पारदर्शी परखड वाणीचे श्री. अशोक मुळ्ये आणि त्यांची ही संमेलने होत असतात, म्हणून तर आपल्या जीवनांत क्रुतक्रत्यतेचे रंग भरले जातात.
माझा वैयक्तिक बालपणीचा असा अनुभव ह्या अवलिया माणसाचा आहे. तेव्हा माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे पाच-सहा दशकापूर्वी मी गोरेगावकर बिल्डींग गिरगाव येथे नातेवाईकांकडे जात असे. तिथेच शेजारी रहाणारा, हा किडकिडीत असा अशोक त्यावेळेला मी पाहिला आहे. तेव्हांपासून माझ्या मनातून तो कधीही गेला नाही आणि आज त्यालाच हे असे अद्वितीय यश आणि त्याच्या कार्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला थक्क व्हायला होते.

"नाथा घरची उलटी खुण":
जुई कुलकर्णी यांनी "नाथा घरची उलटी खुण" ह्या लेखाद्वारे वेगवेगळ्या नामवंतांच्या विविध प्रकारच्या निर्मिती क्षणांचा आणि त्यासाठी अंकुरलेल्या बीजांचा वेध आपल्या लेखात घेतला आहे.

"पत्रकारीतेचा श्रीगणेशा":
दहावीनंतर एका उद्योजकाकडे पायपीट करायला लागणारी कुरियर बाँयसारखी अत्यल्प पगाराच्या नोकरीला मालकाशी मतभेद झाल्यामुळे लाथ मारणारा नितीन चव्हाण हा तरूण पुढे यशस्वी पत्रकार कसा झाला ते सांगणारी कहाणी इथे आहे.

"त्याने पंख दिले":
पाचव्या वेतन आयोगामुळे मिळणारी पगारवाढ स्वखुशीने नाकारणारे जगावेगळे शिक्षक श्री.हेरंब कुलकर्णी नाही रे वाल्या वर्गाच्या चळवळीत कसे पडले त्याची ही ह्रदयस्पर्शी कथा कोणाही सह्रदय माणसाला हलवून स़ोडेल.

ही सारी उदाहरणे केवळ वानगीदाखल दिली. ह्या अंकातील इतर लेखांमध्ये गुलजार आणि त्यांची कन्या मेघना गुलजार यांच्या निर्मिती अनुभवाबरोबरच, श्री. गिरीश कुबेरांचे "तेल त्रिवेणीचा उगम" ही त्यांच्या अभ्यासू व्रुत्तीची प्रेरक कथा इथे आपल्याला वेगळ्यच जगात नेते. दीपिका पडुकोण ह्यांच्या "लिव्ह लव अँड लाफ" प्रतिष्ठानच्या निर्मितीमागचे रहस्यही ह्या भरगच्च संग्राह्य अंकात आहे. त्याशिवाय असलेले, इतर अनेक विषयांवरचे बीजनिर्मिती ते प्रत्यक्ष फळ ह्यांचे चित्र खरोखर वाचनीय असेच आहे. प्रत्येकाने वाचावा आणि त्यातील वेगवेगळ्या अनुभवातून काहीतरी धडा घ्यावा असाच हा सारा खजिन्यांतला ऐवज आहे.

माणूस आणि पशु यांच्यामध्ये जो फरक आहे तो हा की, विचार करणे, कल्पना रंगवणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याबरोबरच भावना आणि भावनांचा अविष्कार करता येणे हा आहे. त्याचे आपण प्रत्येकाने भान ठेवून, आपल्याला काय आवडते, आपण काय उत्तम करू शकतो आणि आपल्याबरोबर इतरांना आनंद देणारे उपयोगी असणारे काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा असे बोधाम्रुत पाजणारी ही साहित्यिक मेजवानीच जणु आहे.

तर असे आहे, "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८चे, आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य! एकमेवाद्वितीय अशा "ऋतुरंग" दिवाळी अंकाद्वारे श्री अरुण शेवते ह्यांनी आपल्यापुढे चितारले आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.
आपण प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा असेच माझे सांगणे आहे.

सुधाकर नातू, माहीम मुंबई१६
Mb 9820632655