सोमवार, १५ मार्च, २०२१

"ह्रदयसंवाद-३६": "सोशल मिडीया-एक वरदान":

 "ह्रदयसंवाद-३६": "सोशल मिडीया-एक वरदान":

सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे जसं खरं, तसं सोशल मीडियातून काहीच मिळत नाही हे म्हणणेही योग्य नाही. तसा अनुभव मला तरी अधून मधून येत असतो, खूप काही नवीन गोष्टी, नवीन जाण वा नवीन माहिती आपल्याला सोशल मीडियातील विविध संदेशातून, व्हिडीओज् मधून मिळत असते. ती शोधायची वृत्ती मात्र आपल्याजवळ हवी, तरच आपल्याला ह्या अतिशय प्रगत माध्यमांपासून आनंद मिळवता येऊ शकेल, असं मला वाटतं.

"वागण्यातील विसंगतीचा विडीओ":
आजचंच उदाहरण घ्या. सहज व्हाट्सअँप उघडल्यावर मी दोन-तीन व्हिडीओज बघितले आणि मला एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटले. पहिला व्हिडिओ, हा आपण पुष्कळदा असे कसे वागतो हा प्रश्न निर्माण करणारा होता. ज्या वेळेला आपण भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला किंवा अंडी वगैरे घ्यायला जातो, तेव्हा घासाघीस करून चार पैसे आपण वाचवले, याचा आपण स्वतःला अभिमान बाळगून समाधान मानतो. तेच आपण ज्या वेळेला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, त्या वेळेला चार पाचशे रुपयांहून अधिक खाऊन झाल्यावर, त्याचे दर योग्य आहेत की नाही याचा विचार न करता सरळ टीप म्हणून पन्नास-शंभर रुपये द्यायलाही कमी करत नाही, असे दाखवणारा तो व्हिडीओ होता, डोळ्यात अंजन घालणारा. त्यातून जो संदेश दिला होता तो असा की:
"आहेरे वाल्यांनी 'नाहीरे'वाल्यांशी वागताना शक्यतोवर थोडी माणुसकी आणि दयाळू वृत्ती दाखवावी आणि अशा किरकोळ विक्रेत्यांकडून काही गोष्टी घेताना जर भाव जास्त दिला गेला तरी खंत बाळगू नये. उलट आपल्याकडून अनाहूतपणे काही ना काही तरी समाजसेवा होते आहे, याचा खरोखर विचार करावा."

"कढीपत्ता मोफत कां?":
त्यानंतरचा व्हिडिओ मी सहज उघडून बघितला, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या विकत घेणारा एक माणूस, अखेरीला भाजी विक्रेत्याला हिशोब विचारतो आणि त्यामध्ये शेवटची गोष्ट कढीपत्ता अशी असते की, जिथे तो किंमत लावत नाही. उलट कढीपत्ता फुकट देत असतो. तेव्हा प्रश्न असा की, कढीपत्ता सगळेच भाजीवाले वर्षानुवर्ष फुकट कां देतात?

हा प्रश्न विचारल्यावर तो भाजी विक्रेता एक छानशी जुनी गोष्ट सांगतो आणि त्यातून कढीपत्ता ही पार्वतीमातेने लाखो वर्षापूर्वी मानवतेला दिलेली
देणगी आहे. म्हणूनच, ही कढीपत्त्यासारखी अत्यंत उपयोगी आणि अनेक रोगांवर उपाय असलेली चीज, सगळ्यांना देवाची परमेश्वराची- पार्वती मातेची देणगी असे समजून कोणीही भाजी विक्रेता सहसा कढीपत्त्याची काहीही किंमत लावत नाही, उलट खुल्या दिलाने तो फुकट देतो. आपणही नेहमी आतापर्यंत ते फुकटच घेत आलो आहोत. व्हिडिओतून ही नवीन माहिती आली.

कढीपत्ता हा पूर्वापार पुराणापासून आपल्यापर्यंत आलेला असा औषधी वस्तूचा ठेवा आहे आणि सहाजिकच माणुसकी आणि समाजाला मदत वृत्तीतून भाजीविक्रेते कढीपत्ता फुकट देतात, त्याचे रहस्य कळले, जे कधीही आत्तापर्यंत माहीत नव्हते. तर अशी गम्मत सोशल मिडियाची आहे की तुम्हाला काहीतरी नवीन जाणीव, नवीन माहिती त्यामधून मिळते.

"पुन्हा चिमणराव !":
तिसर्या विडीओत कुठल्याशा जुन्या गौरव पुरस्कारात अचानक रंगमंचावर येऊन ठेपलेल्या चिमणरावांचा दिलखुलास धर्मवीर विनोद करणारा असा मनोरंजक आविष्कार होता. आजच्या युगात इतक्या दशकानंतर त्याच वेशात येणारे चिमणराव आणि त्यांचे एकंदर बोलणे ऐकणे खरोखर आनंददायी होते. त्यामधून नव्या जमान्यामधील पिढीतील व्यक्तींशी त्यांची एकंदर जुळवून घेण्याची मनोवृत्ती तर व्यक्त होत होतीच, शिवाय नवीन पिढी आता जुन्या पिढीकडे कशा नजरेने बघते ते देखील समजत होते. वयोमानाप्रमाणे माणसं बदलतात, काळ बदलतो आणि त्याप्रमाणे सभोवतालची परिस्थिती सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली कशी बदलते, याचे खरोखर मनोरम चित्र त्यांत होते. काळाचा महिम्याबरोबरच
जुन्या काळातील माणसांचे पेहराव आणि वैशिष्ट्ये यांचे पुनर दर्शन खरंच जुन्या आठवणी जागवणारे होते. ते दिवस आणि तो काळ आता गेला, हे जसे खरे तसेच त्याची अशी विडीओ रूपाने आठवण देखील निर्मळ करमणूक करणारी.

दिलीप प्रभावळकरांच्या सारखा जातिवंत जीवंत अभिनय करत एखादे चिरंतन स्म्रुतीतील चिमणरावांचे व्यक्तिमत्व मनामनात बसवण्याचे सामर्थ्य असणारा अभिनेता चिमणरावांच्या वेशात पुन्हा पाहणे हे खरोखर आनंददायी होते. आज जवळजवळ एका शतकानंतरही चिमणराव हे कै. चिं वि जोशींनी रंगविलेले हे पात्र त्यांच्यामुळे आपल्या मनात राहिले आहे आणि ते केव्हाही पुनःप्रत्ययाचा आनंद आणि समाधान देत असते हे या व्हिडिओमुळे जाणवले.
आता जाताजाता साधा-सोपा whatsapp वर आलेला एक सुंदरसा संदेश येथे देऊन हे
हृदयसंवादाचे विवेचन पुरे करतो.

"सुवचन":
चांगल्या माणसांची कधी परिक्षा घेऊ नका....
कारण ते पार्यासारखे असतात....
जेव्हां तुम्ही त्यांच्यावर घाव घालता, तेव्हा ते तुटले जात नाहीत......
पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात."

ह्या संदेशामधूनही तुम्हाला आपण कसे चांगले वागावे, याचा नवीन मार्ग मिळेल, नवी दिशा मिळेल. माझे प्रामाणिक सांगणे हेच की, यापुढे सोशल मीडिया वापरताना अशी दृष्टी ठेवा की, त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं उपयुक्त मिळवायचं आहे. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हां, नीरक्षीरविवेक व्रुत्तीने, असे चांगले चुंगले वेचण्याचे क्षण येतील ते जरूर साधा. त्यांची नोंद ठेवा, इतरांबरोबर असे शेअर करा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

"टेलिरंजन-१०": "लेखाजोखा मालिकांचा":

 "टेलिरंजन-१०": "लेखाजोखा मालिकांचा":


करमणूक क्षेत्र हे खरोखर बेभरवशाचं आहे. येथे प्रेक्षकांची नस अथवा आवडनिवड अचूक जाणणं, फार फार कठीण असतं. कधी कधी हा हा म्हणता, एखादी मालिका डोक्यावर घेतली जाते, तर बघता बघता दुसरी मालिका अचानक बंद करायची वेळ येते. चित्रपट असो, नाटक असो, अथवा दूरदर्शन मालिका असो, ह्या करमणूक क्षेत्रात निश्चित यश कुणाला, कधी, कसे मिळेल, ते आजतागायत कोणाला सांगता आलेले नाही. याचं कारण काय, तेही शोधणं मोठं कठीण असतं.

आता हल्लीचच उदाहरण बघा ना, "अ" वाहिनी ही खरं म्हणजे सध्या जुनी वाहिनी आणि घरोघरी तिच्यावरील मालिका नेहमी आवडीनं बघितल्या जात. पण नवनवीन दोन वाहिन्या आल्या व स्पर्धा सुरू झाल्यावर आणि आता तर आणखीन चौथी वाहिनी सुध्दा करमणूक करायला सज्ज झालेली आहे. अशा वेळेला मालिकांबरोबर ह्या वाहिन्यांमध्ये लोकप्रियते विषयी, चढ-उतार होताना आपल्याला होताना दिसतात.

हल्ली तर "अ" वाहिनीवरील मालिका नको इतक्या कंटाळवाण्या आणि लांबण लावणाऱ्या झाल्या आहेत आणि कदाचित ही इतर वाहिन्यांच्या तुलनेत तळाला जाते की काय, अशी शक्यता आहे. ही सारी ही गंमत खरोखर विचार करण्याजोगी आहे. हे कां व्हावे, त्याचे निश्चित असे उत्तर कोणाजवळ नाही. ज्याप्रमाणे घोड्यांच्या रेसमध्ये, कुठला घोडा पहिला येईल, हे कळत नाही आणि भलताच कोणीतरी बाजी मारून जातो, तसा प्रकार आपल्याला पुष्कळदा इथेही पाहायला मिळतो.

आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात आता करमणूक क्षेत्राला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे रोजगारासाठी सुध्दा हे क्षेत्र एक अत्यंत महत्त्वाची बाब बनले आहे. ज्याच्या हातात काही ना काहीतरी कला आहे, तो या क्षेत्रात काहीतरी उत्तम करून दाखवू शकतो, त्याला कुठे ना कुठे तरी संधी मिळतेच मिळते, अशी सध्याची परिस्थिती सुदैवाने आहे. परंतु अशा वेळेला योग्य तो सखोल संशोधनात्मक अभ्यास, प्रेक्षकांची अचूक आवड निवड शोधण्यासाठी झाला पाहिजे. ग्रामीण-शहरी आणि अशाच तऱ्हेने वेगवेगळे अनेक गट प्रेक्षकांचे पाडून, त्यामधून कोणाला काय कसे कां आवडते याचे शास्त्रीय सर्वेक्षण जर झाले तर ते प्रेक्षकांना जसे जसे फायद्याचे, तसेच जाहिरातदारांना सुद्धा. कारण हल्ली प्रेक्षकांचा जसा भ्रमनिरास होतो, तसा जाहिरातदारांना सुद्धा आपण जिथे पैसे टाकले, ते फायदेशीर होतात कां हे बघणे गरजेचे आहे. नुसते कलाकारांच्या वा निर्मिती संस्थेच्या नांवांवर जाऊन जर जाहिराती दिल्या जात असल्या, तर शेवटी ते जसे जाहिरातदार यांचे नुकसान तसेच त्या प्रॉडक्ट व सेवेच्या ग्राहकांचेही एक प्रकारे नुकसानच.

तेव्हां या साऱ्या क्षेत्रांत, जे हवेहवेसे व रूचेल असे वाटते ते व तितकेच प्रेक्षकांना कसे देता येईल ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. वाचकमान्य व प्रिय साहित्य क्रुतींची त्यासाठी निवड करावी. निर्मिती पूर्वीच संपूर्ण कथावस्तुची कल्पना चिकित्सा करून तयार झाल्यावरच मालिका निर्माण करावी. कुठल्याही इवल्याशा कथाबीजावर मालिका बेतून ती प्रेक्षकांच्या माथी मारत नंतर ती लांबवण्यासाठी कशीही पाणी घालून भरकटवणे आता तरी बंद करावे. थोडक्यात T20 अथवा ODI सामन्यांप्रमाणे आखिव, बंदिस्त निश्चित कालमर्यादा संभाळणारी असावी.

ह्या महत्वाच्या विषयावर समाजमंथन होणे आवश्यक आहे, इतकेच सध्या म्हणतो.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

सोमवार, ८ मार्च, २०२१

"टेलिरंजन-९": "हे असं वागणं बरं नव्हं !":

 "टेलिरंजन": "हे असं वागणं बरं नव्हं !":

"वाहता वाहे, 'मालिका'माई"!:
माणसाचं आयुष्य म्हणजे जणू आगगाडीचा प्रवास असतो, जणु मुंबई पासून दिल्ली पर्यंत. पण इथे जेव्हां तुम्ही गाडीत शिरता, तेव्हा तुम्हाला जिथे उतरायचं त्या स्टेशनचं तिकीट दिलं जातं ते तुमच्या जवळ असतं पण, त्याच नांव तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला काही करून आयुष्यात किती वर्षे असतील त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही.

आज ती आठवण व्हायचं कारण म्हणजे, नुकतीच अत्यंत कंटाळवाणी अर्थहीन व बेलगाम अशी "माझ्या नवर्याची बायको ही मालिका एकदाची संपली, ही आनंदाची गोष्ट ! टेलिव्हिजनवरच्या मालिका त्या सुरू होतात, पण संपणार कधी हे खरं म्हणजे त्या वेळेला माहीत नसतं. पण फारच थोड्या वर्ष-दोन वर्ष काही पाच पाच वर्ष टिकून राहतात. काही अल्पजीवी देखील असतात. आता हे असं कां? उत्तर काय बघा काही मिळत नाहीच.

मालिकांचा आयुष्ये ही खरं म्हणजे प्रेक्षकांच्या मर्जीवर आणि जाहिरातदारांच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे काही मालिका टिकतात, तर काही मालिका लवकर संपतात. आता त्या जास्त टिकाव्यात म्हणून लेखक आणि इतर आटापिटा करत, काही ना काही त्याच्यामध्ये नवनवीन कल्पना घालतात. ज्या वेळेला एखादी मालिकेत आता पुढे काय करायचं काय करायचं हे समजत नाही-ती वेळ तशी लौकरच येते, तेव्हां कथानकाला वेडीवाकडी वळणे देत मालिका सुरू ठेवली जाऊन प्रेक्षकांचा अक्षरशः अंत पाहिला जातो. कारण उघड असते, बहुतेक मालिकांचा कथाजीव इवलासा असतो.

सहाजिकच कोणतीही नवनवी पात्रे आणून रबर जसा ताणावा, तशा त्या (प्रेक्षकांना उबग येईपर्यंत), तुटेपर्यंत लांबविल्या जातात. आरोग्य सुधारावे, जीव काही करून वाचावा म्हणून, डॉक्टर जसे त्याला निरनिराळे उपाय करून त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात तशी ही माणसांची आणि मालिकांची गंमत आहे.

"विसंगत वागणे":
मराठी मालिकांमध्ये बहुदा पात्रं कधीही तर्कसंगत वागत नाहीत. सर्वसाधारण प्रसंगांमध्ये माणूस जो विचार करेल आणि जी कृती करेल असे अपेक्षित असेल, त्याच्या बरोबर उलट बहुतेक वेळा, निदान एक तरी पात्र उरफाटे वागताना दिसते आणि दुर्दैवाने ते महत्त्वाचे पात्र असते, ज्यामुळे कथानक पुढे पुढे जाऊ शकते.

जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. मालिकांमधील असे न पटणारे उरफाटे वागणार्या पात्रांबद्दल म्हणूनच अशीच तिडीक येते. प्रेक्षक, जाहिरातदार एवढेच काय कलाकारांनाही ग्रुहीत धरून मालिका कशाही भरकटत चालू ठेवल्या जातात. ही सर्वांचीच एक प्रकारे फसवणूक नव्हे कां?

एक ताजे उदाहरण आता पाहू:
"चंद्र आहे साक्षीला"
"मालिकेचा विचका की हो झाला !":
मालिका सुरू होण्यापूर्वी ज्या जाहिराती यायच्या त्या अतिशय आकर्षक आणि चित्तवेधक असल्यामुळे, शिवाय सुबोध भावे सारख्या खंद्या व्यक्तिमत्वाची, अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली "चंद्र आहे साक्षीला" ही मालिका सर्वांनी मोठ्या उत्सुकतेने पाहणे सुरू केले आणि तिने देखील बरेच भाग होईपर्यंत प्रेक्षकांची निराशा केली नाही हे खरे. परंतु भोळी भाबडी तरूणी स्वाती गुळवणी, बनेल श्रीधरच्या कारस्थानांंना भुलली आणि तिची आईदेखील तशीच सरळमार्गी असल्यामुळे, ही तरुण मुलगी श्रीधर आणि सुमन ह्यांच्या कुटील कारस्थानाला फशी पडली. परंतु तोपर्यंत पुष्कळ उशीर झाला होता आणि अखेर स्वातीला आत्महत्या करण्यापर्यंत नैराश्य आले, या भागापर्यंत ही मालिका निश्चितच अतिशय उत्तम आणि नाट्यपूर्ण अशीच होती.

त्यामुळे प्रेक्षकांना देखील पुढे काय होणार, याची उत्सुकता असताना, काही विपरीत तेच घडले, स्वातीच्या सहाय्याला नेहमी उभा रहाणारा नन्ना मुंबईला गेला आणि संग्राम नावाचे एक नवेच मात्र अचानक मालिकेत उगवले. नुसता तो एकटाच नव्हे तर त्याचे सारे कुटुंबच, त्यानंतर मालिकेचा कब्जा घेऊन बसले. संग्राम जो केवळ केव्हा तरी स्वातीचा कॉलेजमधला एक सहाध्यायी होता, तो तिच्या प्रेमात काय पडतो आणि तिचा सारा विचित्र भूतकाळ माहित असून देखील तो तिच्याशी विवाह करण्यापर्यंत काय मजल घेतो, हे सारे खरोखर न पटण्याजोगे. ही लांबण व हे वळण मालिकेला भलतीकडेच नेणारे असे होते.

अक्षरशः प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहीपर्यंतच्या भागांमध्ये श्रीधर आणि सुमन कुठे गायब झाले आणि अखेरीस स्वातीला दिवस गेल्याचे केल्यानंतरच, श्रीधर श्रीरंग बनून, संग्रामच्या कारखान्यात प्लांट मॅनेजर म्हणून नोकरीला येतो काय, हे सारे अकल्पित व अतर्क्य आणि विश्वास न ठेवण्यासारखे. श्रीधर हे नाव बदलून श्रीरंग हे नाव घेणारा हा बनेल माणूस संग्रामच्या लक्षात कसा आला नाही? त्याने त्याची निवड करण्यापूर्वी कुठलीच माहिती घेतली नव्हती कां, अशा शंका देखील साहजिकच मनात उभ्या राहिल्या.

थोडक्यात ही मालिका योग्य दिशेने चालली होती. तिला संग्रामच्या आगमनाने भलतेच वळण मिळाले. शिवाय सारे माहीत असूनही संग्राम स्वातीचे जे काही गर्भारपण आहे ती आपलीच चूक आहे असे बिनदिक्कत सगळ्यांना खोटे सांगतो, ते देखील खरोखर संतापजनक आणि नाव पटण्याजोगे. एक चांगली मालिका वाढवण्याच्या नादात, तिला कशीही भरकट न्यावी कशी, याचे "चंद्र आहे साक्षीला" हे मूर्तिमंत उदाहरण असू शकेल.

सुरूवातीला ही मालिका "कुसुम मनोहर लेले" ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित असावी असा प्रेक्षकांचा समाज असल्यामुळे, सगळ्यांनीच ती त्या दृष्टिकोनातून पाहिली आणि तिला हे असे तिरपकडे रुप अखेरीस मिळाले. ह्यापुढे संग्राम आणि श्रीधर/श्रीरंग यांच्यातील द्वंद्व दाखवले जाईल खरे, परंतु ते सारे पटण्याजोगे असेच वाटत
राहील. नाट्यपूर्ण कथानकाचा विचका कसा करावयाचा, ह्याचे एक उदाहरण म्हणून या मालिकेचे आपण सारे पैलू पाहिले. बहुतेक इतरही मालिकांमध्ये अशाच तऱ्हेने पाणी घालून त्यांना वेडीवाकडे बनवली जाते, हेच खरे आणि म्हणूनच "हे वागणं बरं नव्हं !" म्हणायची वेळ येते.

दुसरं ताजं उदाहरण:

"सुंदरा मनामध्ये भरली":
'शर्यती'चा नाही पत्ता....
मालिकेची वाट लागली":..

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

गुरुवार, ४ मार्च, २०२१

"आजोबांचा बटवा-१/२/'२१": "जुने ते सोने":

"आजोबांचा बटवा-१/२/'२१": "जुने ते सोने":

व्यक्ती तितक्या प्रकृती हे कुणी म्हटलय ते खोटं नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र बुद्धीचा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा असतो. प्रत्येकाची जडण-घडण ही वेगळ्या प्रकारे होत असते, शिवाय अनुवंशिक असे पिढ्यान्पिढ्या अंगी उतरलेले गुण देखील प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य ठरवत असतात. मित्रमंडळी, शिक्षण आई-वडील नातेवाईक समाज अशा अनेक बाबींमधून तुमचे व्यक्तिमत्त्व घडत असते. यामध्ये माणूस ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला ती वर्षै अत्यंत महत्त्वाची असतात. सभोवतालचे सांस्कृतिक-सामाजिक आणि इतर वातावरण कशा तऱ्हेचे आहे, यावरही त्या माणसाची एकंदर प्रगती अथवा आवडनिवड तसेच जीवनशैलीचे मार्ग, विचारांची दिशा ठरत असते.

हे सारे आज आठवायला कारण आज अचानक मी माझ्या जुन्या लेखांचं एक बायडींग करून पुस्तक तयार केलं होतं, ते नुसतच वर्षानुवर्षे पडून होतं. कोरोनाच्या या काळात घरामध्ये कायम बसलो असताना आज त्या मोठ्या जुन्या बाडाकडे माझे लक्ष गेले आणि त्यातील पहिलेच पान उघडल्यावर, तेथे मला आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही सायनला ज्या सोसायटी व आसपासच्या माहोलात लहानाचे मोठे झालो, त्या सांस्कृतिक वातावरणाचे अप्रतिम वर्णन करणारा एक इंग्रजी लेख त्यावेळच्या हौसिंग टाईम्स मध्ये चक्क छापून आला होता हे ध्यानात आले.

२६ जानेवारीला दरवर्षी आमच्या सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचा मिळून एक दोन दिवसांचा मोठा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत असे. त्याची २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षातील खास कार्यक्रमाचे वर्णन त्या लेखात होते. तो १९८२ सालचा हाऊसिंग टाईम्सचा अंक होता आणि त्यातील त्या लेखाचे पान माझ्या त्या संग्राह्य बुकात आढळले. ते तिथे कधी कसे आले ते मला आता आठवतही नाही. आज ते इथे पुनश्च उलगडताना मला खूप आनंद होत आहे.

इंग्रजीमध्ये असलेला हा लेख, ज्या मध्ये माझाही एक फोटो आणि माझा कार्यभाग, तसेच माझ्या इतर मित्रमंडळींचा त्या स्नेहसंमेलनाला लागलेला हातभार, प्रतिष्ठित विजय मर्चंट आणि दया डोंगरे यांची आमच्या सोसायटीला त्या निमित्ताने भेट, अशा तऱ्हेचे बहारदार ओघवते वर्णन या लेखात आलेले आहे. तेव्हा त्या लेखाची फोटो कॉपी इथे  देताना आज मला पुनःप्रत्ययाचा सुखद अनुभव येत आहे. आजोबांचा बटवा ह्या लेखमालेत हा लेख शोभून दिसेल असे वाटल्याने, मी तो येथे मुद्दाम देत आहे. आपल्यालाही तो वाचून एक प्रकारची वेगळीच सुखद अनुभूती होईल, अशी आशा आहेःः



अशा तर्हेचे सामुहिक सामंजस्य, सौहार्दाचे परस्पर संबंध व कौतुकास्पद सांस्कृतिक वातावरण हल्ली अभावानेच दिसते. आज जे काही आम्ही आहोत व जे आम्ही साध्य केले आहे, त्यामागे  ह्या स्नेह महोत्सवांचा सिंहाचा वाटा आहे. मला स्वतःला म्हणूनच ह्या ह्रद्य संस्कारशाळेत लहानाचा मोठे झाल्याचा मनापासून अभिमान व समाधान वाटते. हा जुने ते सोने अनुभव आपल्याला कसा वाटला ते प्रतिसादात आपण जरूर मांडावा.

धन्यवाद
सुधाकर नातू