मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

"किमयागार कल्पना":


 "किमयागार कल्पना":

उपलब्ध साधनसामुग्रीचाच वापर करुन, एखाद्या किमयागार कल्पनेच्या सहाय्याने अधिक काम अथवा योगदान, कमी श्रमात वा वेळात तसेच, कमी खर्चांत देता येते. माणसाला तरफेचा, चाकाचा, अग्नीचा आणि शेतीचा लागलेले शोध क्रांतीकारक व जीवनशैलींत आमुलाग्र बदल, संक्रमण करणारे होते. गतीमान विकासाचा मार्ग व दिशा अशा किमयागार कल्पनांतूनच जन्म घेतात. "काल"च्या गरजांमुळे जे घडले, त्यांचा "उद्या" वर काय काय परिणाम होऊ शकतो, ह्यांचा विचार करुन, नविन मार्ग, दिशांचा शोध घेत, उपयुक्त कल्पना निर्माण करत, त्या प्रत्यक्षांत आणण्याची क्रीया सातत्याने घडत असते. त्यामुळेच मानवी जीवन अधिक सुलभ, सुकर होत राहिलेले आहे.

लहानपणी, मला शाळेंत पोहोचवायला, गोपाळ नावाचा गडी होता. तेव्हां राधाबाई नांवाची एक प्रौढ विधवा, एक एका फेरीत ८/१० मुलांच्या हातांची साखळी करून त्याना शाळेत नेत व आणत असे. तिचे ते उपजीविकेचे साधन होते व ते तिनेच समाजांतील गरज ओळखून शोधले होते. काळाच्या ओघांत ह्याच संकल्पनेचे स्कूल बस सर्विस सारख्या आज जगन्मान्य व्यवसायात झालेले दिसेल.

त्याच काळाचे आसपास, एक हरहुन्नरी माणूस दररोज पुण्याहून मुंबईस डेक्कन क्वीनने येई व सायंकाळी त्याच गाडीने परत तो पुण्यास जाई. हया दोनही शहरातील नागरिकांची टपाल वा इतर महत्वाच्या गोष्टींची तो प्रवासी ने आण करी. अत्यल्प खर्चांत वेगाने हे काम तो विश्वासाने करे. त्या काळी, हा कोण वेडा असा प्रवासाचा रोज खटाटोप करतोय, असे त्याला हिणवलेही गेले. पण आज जगभर अत्यंत गरजेच्या बनलेल्या कुरीयर सर्विसची ती येथली, मुहूर्तमेढ होती.

कौटुंबिक संकट ओढल्यावर हातात पोळपाट लाटणे घेऊन स्वयंपाकाची कामे करणे अथवा घरी पापड लोणची, मसाले वा फराळाचे जिन्नस बनवून किंवा भोजनाचे डबे पुरविणे, ह्या सार्या क्रियांमधूनच आता लोकप्रिय झालेले ग्रुहोद्योग ही सारी गरज-कल्पना-उपयुक्त योजना ते व्यवसायिक उद्योग अशा साखळीचीच उदाहरणे आहेत.

हाताने लिहायच्या ऐवजी छपाई किंवा प्रती काढण्यासाठी फोटो काँपी यंत्र, कार्बंन पेपर, सायक्लोस्टाईलिंग यंत्र, टाईप रायटर त्या नंतर  pc ते lap top ते mobile ते smart phone हे बदल असेच घडत आले आहेत. प्रवासाच्या सुविधांचा विचार केला तर, बैल गाडी वा घोडा गाडी, सायकल सायकल रिक्षा, टू विल्हर,ते थ्री विल्हर पुढे चार चाकी कार, ट्रेन विमान जहाज, पाणबुडी हे शोध चित्तथरारकच नव्हेत कां? करममणुकीच्या क्षेत्रांतील रेडिओ,ट्रान्झीस्टर टेप रेकाँर्डर, कँमेरा, चित्रपट, दूरदर्शन, व्हिडीओ, डीव्हिडी
अशी रोमहर्षक संक्रमणे जवळ प्रत्येक क्षेत्रांत झालेली दिसतील. मूल्यवर्धन हा ह्या सर्व बदलांचा गाभा आहे.

ठेकेदारीचे पुढचे रूप म्हणजे आऊट सोर्सिंग होय. आपली जबाबदारीची कामे दुसर्यांकडून करून घेणे ठिक ठिकाणी दिसते. माहिती व तंत्रद्यानामुळे एका देशातील कामे लांबच्या देशातील आस्थापनांकडून करवून घेतली जातात. प्रवासी संस्था, ईव्हेंट मँनेजमेंट कंपन्या विवाहाचे बाबतीत, अगदी निमंत्रण व्यवस्था, भोजन, सजावट, धार्मिक विधी, स्वागत, पाठवणी अशा सर्व कामांची जबाबदारी यशस्वीपणे पाळतात. एव्हढेच काय विवाह जुळणीचे काम नियतकालिकांनी जाहिरातीद्वारे करण्यापासून आता तर लोकप्रिय वेब साईटस् करताना दिसतात. समाजाची जीवनशैलीत हया सर्व संक्रमणांमुळे आमुलाग्र बदल सतत होत आहे.

माझ्या बाबतीत सांगायचे तर मी काँलेजमध्ये असताना माझ्या पांढर्या  शर्टची काँलर खराब झाल्यावर ती कापून तिथे लाल रंगाच्या कापडाची पट्टी मी शिंप्याकडून शिवून घेतली होती. तसेच वापरून खराब झालेल्या फूल पँटची मी प्रथम थ्री फोर्थ, नंतर चक्क हाफ पँट केली होती. एका दशकापूर्वी मी बागेत बसलो असताना मोबाईल ऊलटा धरून माझे मीच फोटो काढत असे. आजची सेल्फी तेव्हा अस्तित्वातही नव्हती! ज्योतिषाचा अभ्यासक म्हणून राशीभविष्य लिहिताना प्रत्येक राशीला त्या कालखंडातील ग्रहबदलानुसार अनुकूल गुण देवून ते मी अधिक वस्तुनिष्ठ केले आहे. हे देखिल मूल्यवर्धनाचे उदाहरण मानता येईल.

किमयागार विचारधारेचा आगामी काळांतील मार्ग कसा असेल? थोडक्यात काही संकल्पना मांडतो:

१ कुरीयर सर्विस देणारे घरी येऊन आपले टपाल घेऊन जातात. तशीच सेवा पोस्टाने देणे सुरू करणे गरजेचे आहे. पोस्टमन टपाल  वाटतात तेव्हा, जे टपाल पाठवू इचछीतात, तयाचेकडून ते घेऊ शकतात. मनुषयबळ न वाढवता हे काम होऊ शकेल व पोस्टाचे ऊत्पन्न वाढेल. नागरिकांची सोय होईल.
२ मला आठवते काही दशकांपूर्वी ठराविक वेळी रात्री ठराविक ठिकाणी पोस्टाची फिरती गाडी येत असे व तेथे पोस्टाच्या सर्व सेवा मिळत असत. कार्यालयीन वेळेनंतर ही सेवा उपयुक्त होती. ती पुन्हा चालू करावी.
3 काँलेजच्या एका ब्रेन स्टाँर्मिंग कार्यक्रमात, मी एक अभिनव कल्पना मांडली होती. प्रत्येक अणु ही एखादी सूर्यमाला असावी. केंद्रातील प्रोटाँन म्हणजे एक 'सूर्य व सभोवती गोलगोल फिरणारे ईलेक्ट्राँन हे जणु विविध ग्रह. अंतर हे सापेक्ष असते, ह्या द्रुष्टिकोनाचा मुलभूत विचार करून ही संकल्पना मी मांडली होती.
४ गुणात्मक गोष्टी ह्या व्यक्तिसापेक्ष असतात, त्यामुळे, त्यांचे आकलन वस्तुनिष्ठपणे होण्यासाठी त्याना योग्य ते संख्यात्मक रूप देणे, आवश्यक असते. विकास व प्रगतीची दिशा अशा तर्हेच्या रूपावरून मिळते. मी त्या द्रुष्टिने विविध विषयांचे अनुषंगाने अशी गुणात्मक ते संख्यात्मक रुपांतर करण्याच्या पद्धती निर्माण केल्या आहेत.
५ माझ्याकडून अजून एक किमयागार संकल्पना मी मांडली. ती म्हणजे, जीवनांत समाधान मिळवायचे असेल तर ही सप्तपदी अंगिकारा:
५.१ द्रुष्टि बदला,
५.२ "जीभे"वर  ताबा ठेवा.
५.३ "हाता"ने सतत "देत" रहा.
५.४ "ह्यदया" पासून इतरांवर प्रेम करा.
५.५ सतत "चालत" रहा,अर्थात नेहमी "पुढे" बघा.
५.६ "काना"नी ऐका, पण काय "पोटां"त ठेवायचे आणि काय "ओठा"वर आणावयाचे, हयाचे तारतम्य बाळगा.
५.७ आणि सर्वांत महत्वाचे: नेहमी भावना व बुद्धिचा समतोल राखत निर्णय व क्रुती करा.

सुधाकर नातू.

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

"रंगांची दुनिया-रसास्वाद-चित्रपट":

 "मुंबई-पुणे-मुंबई 3"-एक जीवाभावाचा प्रवास:

"Marathi films have come of age" असं जे म्हटलं जातं ते बहुदा आँस्कर वारी करणार्या "श्वास" चित्रपटापासून! पूर्वी पाटील तमाशा आणि लावण्या यांच्यात मराठी चित्रपट गुरफटला होता, त्यानंतर विनोदी चित्रपटांची लाट आली होती. परंतु श्वासनंतर जीवनातल्या वेगवेगळ्या भावनिक आणि कौटुंबिक पेचप्रसंग प्रश्न आणि वातावरण यांच्या बाबतीत विस्ताराने काही बरे वाईट दाखवणारे चित्रपट येऊ लागले. त्यामुळे हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट हे निश्चितच आगळेवेगळे आणि विचारप्रवर्तक तसेच करमणूकप्रधान ही भासू लागले. विशेषतः अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांची घोडदौड चांगली चालू आहे. हिंदी चित्रपटांपेक्षा मल्टिप्लेक्सेस् मराठी चित्रपटांना प्राधान्य देत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे.

आता आम्ही या लेखामध्ये मुंबई पुणे मुंबई 3 ह्या चित्रपटाविषयी आमचे अनुभव सांगणार आहोत.
सर्वसाधारणपणे एखादा चित्रपट जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या पुढच्या आवृत्त्या काढण्याचा मोह सर्वांना होतो. नाटकांच्या बाबतीत देखील आपण नुकतेच "एका लग्नाची दुसरी गोष्ट" हा प्रकार बघितला. सर्वच दुसरे तिसरे प्रयत्न यशस्वी होतात असे नाही. मात्र "एम पी एम" च्या बाबतीत पहिले दोन प्रयोग तरी भरघोस यश मिळवून गेले. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्सुकतेने तिसऱ्या भागाची वाट पाहिली गेली आणि आता तिसरा भाग प्रकाशित झाला. हा एका जीवाभावाच्या प्रवासाच्या अनुभवाचा प्रवास आहे. त्यामध्ये मुंबईकर पुणेकर या दोन्ही शहरांमध्ये विरोधाभास ह्यांतले काहीही नाही. सहाजिकच पहिल्या दोन भागांमध्ये जे जसे होते तसे येथे नाही, इथे आहे ह्या दाम्पत्याची- गौरी आणि गौतमची विवाहानंतर ची कहाणी.

हा वेगळा विषय वेगळ्या तऱ्हेने हाताळणारा हा चाकोरीबाहेरच्या विश्वाचा चित्रपट आहे. सहाजिकच, तो पहाण्यासाठीचा प्रेक्षकवर्ग देखील मर्यादित असू शकतो. विशेषता प्रत्येक नवदाम्पत्याने हा चित्रपट बघावा अशा तर्हेचा आहे. मात्र ज्याला युनिव्हर्सल अपील किंवा लहान-थोर प्रेक्षक मिळवून चित्रपट यश मिळवू शकेल अशा तर्हेची करमणूक वा प्रसंग मात्र ह्या चित्रपटात नाहीत.

सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. विशेषतः नायक स्वप्नील जोशी नायिक मुक्ता बर्वेने कमाल केली आहे. हा चित्रपट जवळ जवळ दोन घरांत घडत असल्यामुळे, तो बंदिस्त वाटतो. पहिल्या दोन भागां इतका, हा बोलपट तेवढे यश मिळवेलच ह्याची खात्री देता येत नाही. बाळंतपणासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस श्री. सतीश राजवाडे ह्यांच्यासारख्या प्रतिभावान आणि गुणवंत दिग्दर्शकाने करावे, त्याचे कौतुकच आहे. म्हणूनच मराठी चित्रपटांच्या नव्या लाटेत हा चित्रपट आपले स्वतःचे वेगळे स्थान कायम राखून राहील असे म्हणावेसे वाटते.

"मुंबई-पुणे-मुंबई 3 चा धडा":

स्त्रीचे महती अगाध आहे. तिची जेवढी किंमत ठेवली जावी, तेवढी ठेवली जात नाही, उलट बिचारीला कायमच दुय्यम भूमिका पत्करावी लागते. दुर्दैव आहे की, तिच्या खरोखर आश्चर्य वाटावे अशा multy tasking ability बद्दल कुणीच काही लक्षात घेत नाही. एवढी ती हुशार असते की, घरामध्ये एखाद्या निष्णात मटेरियल मॅनेजरने लाजावे, इतक्या कुशलतेने ती काय हवं काय नको ह्यांची बरोबर नोंद घेऊन, घराचे घरपण अबाधित राखीत असते. काँर्पोरेट सीईओ प्रमाणे ती एकंदरच घरातील माणसांमध्ये नातेसंबंध आपुलकीचे राहावे ह्याबद्दल नेहमी जागरूक असते आणि तिच्यामुळेच संसारामध्ये गोडी कायम राहते.

"गृहिणी सचिवः सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ" असे स्रीच्या बाबतीत म्हटलं जातं, ते खोटं नाही. आता तर, ती घराबाहेर पडून करियर वुमन झाल्यामुळे, पुरुषापेक्षा जास्त उच्च प्रतीचे योगदान संसारामध्ये देत असते. पण दुर्दैवाने तिला जो मान मिळायला हवा, जे स्थान तिला द्यायला हवे, ते दिले जात नाही.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाचा हा प्रवाह अव्याहत राहण्यासाठी ती जो त्याग व जे काही करते ते खरोखर कुणालाही जमण्‍यासारखे नाही. मूल जन्माला घालणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. नऊ महिने तिचे काय काय त्रास हाल-अपेष्टा होतात व ती येणाऱ्या "बाळ-अंत-पण" ह्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जाते, ते खरोखर शब्दा पलीकडचे आहे. पण ही जाणीव कुणालाच नाही. पुरुष त्या मानाने भाग्यवान. अर्थार्जन आणि कुटुंबाचे संरक्षण ह्या पलीकडे त्याच्या वाटेला विशेष जबाबदार्या येत नाहीत. पण स्त्रीला मात्र मूल जन्माला घालणं आणि त्याच्यावर संस्कार करणे, त्यांना घडवत मोठे करणे अशी जबाबदारी जास्त येते.

ह्या चित्रपटातली गौरी नऊ महिने जे शारीरिक हाल व मानसिक भावनिक ताणतणाव सहन करते ते पाहिल्यामुळे आपला कोणत्याही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा आमूलाग्र बदलून जातो. तिला सलाम करावा आणि स्री ही देवी आहे असे मान्यच करावे, असे विचारमंथन संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. हेच ह्या चित्रपटाचे यश आहे. म्हणूनच हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरावा. 

बकेट मध्ये "बकेट लिस्ट"!:

महाराष्ट्रात
यंदा पुरेशा पावसाळ्याच्या अभावी तीव्र दुष्काळ असला तरी, मराठी चित्रपटांचे मात्र मोठे पीक आलेले दिसते. त्यामुळे एकाच वेळी अनेक चित्रपट प्रकाशित होत आहेत आणि त्यापायी बहुधा निर्मात्यांचे खूप नुकसान होते आहे.
ह्या पार्श्वभूमीवर "बकेट लिस्ट" हा चित्रपट थिएटर मध्ये कधी आला, कधी गेला हे आठवत पण नव्हते आणि तेव्हा मी तो पाहिलाही नव्हता. आज टीव्हीवर तो चित्रपट दोनदा असल्यामुळे, मी दुपारी तो पहाण्याचे धार्ष्ट्य दाखवले खरे, पण खरोखर घोर निराशाच झाली.

प्रारंभापासूनच हे काय चाललंय याची कल्पनाच येईना. सुरुवातच मुळी झाली ऑपरेशन टेबलवर! ऑपरेशन व्हायच्या आधीच डॉक्टरला थांबवून नायिका काय काय करायचं, त्याची लिस्ट बडबडू लागली, तेव्हाच समजले की पुढे काय ताट वाढून ठेवले आहे! दोन-तीन मिनिटातच ऑपरेशनचा त़ो खेळ संपला आणि काही काही वेळानंतरच्या संवादातून लक्षात आले की, हे म्हणे हार्ट ट्रान्सप्लांट होते, ते पाहून मी अक्षरश: उडालोच!
अजून खूप धक्के पुढे खायचे होते, कारण जीने कोणी तिला आपले ह्रदय दिले ते नायिकेला समजते. हे म्हणजे सिनेमँटिक लिबर्टीची हद्द झाली! नायिका त्या डोनर व्यक्तीच्या घरी जाते, हा जेव्हा प्रकार मी बघितला तेव्हा मला कळेना आता काय करावे बरे

सहाजिकच नंतर तो चित्रपट पाहताच मी आंतल्या खोलीत झोपी गेलो. तास दीड तासानंतर चित्रपट संपायच्या वेळेला बहुधा मला जाग आली अन् मी बाहेरच्या खोलीत आलो. टीव्ही चालूच होता माझ्यानंतर तो चित्रपट पहाणारी माझी पत्नीही चक्क डाराडूर झोपून गेली होती. चित्रपटाचा हा सगळा काय प्रकार होता, ह्याचा मला तरी काही अर्थ कळला नाही. त्यामुळे चित्रपट पुढे बघितल्याचे दुःख मुळीच झाले नाही.
असा चित्रपट कशाकरता काढतात हे कळणे कठीण आहे. चित्रपटात जवळ जवळ सतत प्रत्येक फ्रेममध्ये नायिकाच दिसावी, ह्या उद्देशाने तो चित्रपट काढला गेला असावा असे मानण्यास जागा आहे.

आज रात्री सोनीवर पुन्हा तो चित्रपट असल्यामुळे तो बघितला नाही तरी चालेल हे कळावे, म्हणून हा लेखन प्रपंच. नावाप्रमाणेच "बकेट लिस्ट" ला मी बकेट मध्ये टाकून दिले 
आहे !

तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवणे उत्तम!

सुधाकर नातू