गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

"रद्दी'चे महाभारत ! ": 😊

 👍"रद्दी'चे महाभारत ! ": 😊

हल्ली वर्तमानपत्रांमध्ये वाचायला काही विशेष नसतं. ज्या बातम्या असतात त्यापैकी बऱ्याचशा विविध प्रकारची
गुन्हेगारी किती वाढत चालली आहे, त्याचेच भयानक दर्शन घडविणाऱ्या किंवा व्यवस्थेमध्ये किती, कुठे कशात त्रुटी आहेत ते दाखवणाऱ्या अथवा राजकीय सुंदोपसुंदी आणि त्यातून निर्माण होणारा गदारोळ, इ.इ. अशा मन उद्विग्न  करणाऱ्या बातम्या अधिक असतात.

त्यापेक्षा वासरात लंगडी गाय शहाणी असल्याप्रमाणे,
'पुरवणी' बऱ्यापैकी वाचनीय असते. विशेषत: त्यामधील शब्दकोडे सोडविल्याशिवाय दिवस जात नाही आणि तेच वर्तमानपत्रातले एकमेव (बहुतेकांसाठी) विशेष आकर्षण असते ! पुरवणीमध्ये काही वेधक व्यक्तिमत्वे किंवा समाज उपयोगी काही कार्य होत असल्याचे पुरावे देणारेही वाचनीय असते. तसेच माहितीपर ज्ञानात भर घालणारे वाचन करावयाला तेथे थोडाफार वाव मिळतो. सारांश रोजचा पेपर हा अगदी टाकाऊ म्हटला नाही, तरी पूर्वीसारखा वाचावासा वाटतोच असं नाही. कारण अग्रलेखांचाही दर्जाही तसा
सुमारच असतो. बहुदा मीडियावर हा विशिष्ट अशा समूहाचे नियंत्रण असल्यामुळे, असे होत असावे.

पण रोज रतीब वर्तमानपत्रांचा होणे अपरिहार्य असल्यामुळे, रद्दी मात्र खूप साठते. शहराप्रमाणे रद्दीचे भाव वेगळे वेगळे असतात. पुण्यामध्ये रद्दीला वीस रुपये भाव आहे हे आम्हाला समजले. त्या उलट मुंबईमध्ये दहा रुपये मिळाले तरी खूप अशी तफावत आहे ! वाचनापेक्षा या रद्दीचेच अधिक महत्त्व त्यामुळे वाढत चालले आहे की काय असे वाटते ! एकंदरच सामाजिक बाजारू वृत्ती वाढत जाण्यामुळे
सार्वत्रिक ह्रास अटळ असल्यामुळे मीडिया बाबतीत सुद्धा आपल्याला तसे चित्र दिसणे साहजिक आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. ते बरोबर किंवा चूक हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मला केवळ आज वर्तमानपत्र हा विषय चिंतनासाठी घ्यावासा वाटला, कारण कालच आम्ही तुडुंब अशी रद्दी विकली आणि तीच माझ्या घर मनात घर करून राहिली आणि काळ्यावर पांढरे हे असे उमटले !

धन्यवाद
सुधाकर नातू

ताजा कलम
😊 "खरं म्हणजे, नुकताच 'अक्षर' दिवाळी अंक'22,  मी थोडाफार चाळण्यासारखा वाचला आणि "दिवाळी अंकांची मांदियाळी"सदरामध्षे लेखन करावं असं वाटलं खरं, पण अंक बाजूला राहिला आणि हे "रद्दीचे महाभारत" माझ्याकडून लिहून गेले.
'अक्षर' वांग्मयाची चिरफाड पुढच्या लेखात करता येईल ! 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

👍👍नाव हाच ठेवा !":👍👍

 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

"नाव हाच ठेवा !":
कुठलेही नाव घेतले की ठराविक व्यक्तींच्या प्रतिमा आपोआप मनात उमटतात.... .

# "मनमोहन" म्हटलं की.....
ताबडतोब आठवतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग...
व जुन्या जमान्यातले विख्यात चरित्र अभिनेते मनमोहन कृष्ण !
किंवा
'ती पहा, ती पहा...'सारखी अजरामर कविता लिहिणारे कवी मनमोहन नातू
आणि आणि.....
मनमोहन म्हटलं की अर्थातच जीवन तत्वज्ञान उलगडणारं, 'भगवद् गीते' सारखं महाकाव्य अर्जुनाला सांगणारा....
योग योगेश्वर भगवान श्रीकृष्ण !....

# "नेताजी" म्हटलं की.....
अर्थातच समोर येतात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात असीम योगदान देणारे, सेनापती नेताजी सुभाष चंद्र बोस....
किंवा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा आडविणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नेताजी मुलायम सिंग...

# "आचार्य" म्हटलं की......
प्रथम आठवतात, भूदान चळवळीचे प्रणेते...
आचार्य विनोबा भावे !
तसेच आचार्य दादा धर्माधिकारी
आणि
'दहा हजार वर्षात' एकमेव असे वक्ते व चतुरस्त्र व्यक्तिमत्व आचार्य अत्रे !

# "राजेश" म्हटलं की....
अर्थातच डोळ्यासमोर येतो तो...
हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव सुपरस्टार...
one & only one राजेश खन्ना

# "राहुल" म्हटलं की.....
साहजिकच समोर येतात भारताच्या तीन माजी पंतप्रधानांचा अलौकिक वारसा, "भारत जोडो" पदयात्रेतून पुढे नेणारे राहुल गांधी
आणि राहुल म्हटलं की "दिलवाले दुल्हनिया  ले जायेंगे" सारख्या विक्रमी चित्रपटातील राहुल...
अर्थात. किंग शाहरुख खान !.....

# "सिंधू"म्हटलं की,,,,
अर्थातच डोळ्यासमोर येतात अनेक अनाथांच्या पालनकर्त्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ
आणि
"सिंधू" म्हटलं की भाषा प्रभू राम गडकरी गणेश गडकरींच्या 'एकच प्याला' मधली अभागी सिंधू दुःख संकटे सहन करणारी बिचारी सिंधू !...

हा "नाव हाच ठेवा" सिलसिला वाचकही अशाच कल्पनाशक्तीवर पुढे पुढे नेऊ शकतात.....

अखेरीस...
# "सुधाकर" म्हटलं की नजरेसमोर येतो...
'एकच प्याला' मधील दारूच्या पूर्ण आहारी जाऊन आयुष्याची बरबादी करून घेणारा..
दुर्दैवी वकील..सुधाकर !
आणि.....
आणि...
अशा "एकमेवाद्वितीय नावाचा ठेवा"..
ज्याच्या नशिबात जन्माबरोबर लिहिला गेला...
तो मी सुधाकरच !

धन्यवाद
सुधाकर  नातू
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

👍"शनी आठवा: संबंधीची फळे!:"👌

 शनी आठवा: संबंधीची फळे:                                               आता जन्मपत्रिकेत ज्या स्थानी शनी असतो, त्याचे परिणाम पाहू. शनी पत्रिकेत ज्या स्थानापासून आठवा असतो, त्या स्थानासंबंधीची फळे, नुकसानकारक, त्रासदायक मिळण्याची शक्यता असते.


प्रथम स्थानी डोक्यावर शनी म्हणजे पत्रिकेतील रोगस्थान-सहाव्या स्थानाला तो आठवा असेल. म्हणून मानसिक चिंता, सातत्याने काही ना काही आजार अशी फळे.

दुसर्या स्थानचा शनी पत्रिकेतील विवाहस्थानाला आठवा, त्यामुळे विवाहजुळणीत अडचणी विलंबाने विवाह आणि वैवाहिक कौटूंबिक सुखात बाधा.

तिसर्या स्थानातील शनी, पत्रिकेतील आठव्या स्थानाला आठवा, म्हणून शारिरीक अपंगत्व परावलंबित्व देणारे रोग वा प्रसंग आणि हाल होऊन म्रुत्यू होण्याचा धोका.

चौथ्या स्थानांतील शनी पत्रिकेतील भाग्यस्थानाला आठवा होतो, त्यामुळे संधी डावलल्या जाणे, ईप्सित फळे व अपेक्षा पुरी न होणे वा त्यासाठी खूप कष्ट विलंब, ही फळे.

पाचव्या स्थानचा शनी पत्रिकेतील व्यवसायस्थानाला आठवा, म्हणून अशा माणसांनी धंद्यात पडू नये, नोकरीतही अपेक्षाभंग, मनस्ताप अडचणी, ही फळे.

सहाव्या स्थानचा शनी पत्रिकेतील लाभस्थानापासून आठवा, म्हणून संधी हुकणे, नुकसानीचे योग ही फळे मिळण्याची शक्यता.

सातव्या स्थानी-विवाहस्थानी शनी, पत्रिकेतील व्यय स्थानाला आठवा, म्हणून विवाहाला विलंब, आर्थिक नुकसान वा फसवणूक.

आठव्या स्थानी शनी हा पत्रिकेच्या प्रथमस्थानाला आठवा, त्यामुळे खडतर मंदगतीने प्रगती करणारं जीवन.

नवम-म्हणजे भाग्यस्थानचा शनी पत्रिकेच्या द्वितीय म्हणजे धन वा कौटुंबिक स्थानाला आठवा, त्यामुळे आर्थिक ओढाताण, कौटुंबिक कलह अशी फळे मिळू शकतात.

दशमस्थानचा शनी हा पत्रिकेतील त्रुतीय स्थानाला आठवा, त्यामुळे भावंडाशी मतभेद, प्रवासात कष्ट, अपघाताचा धोका.

लाभ अथवा अकराव्या स्थानचा शनी, पत्रिकेतील चतुर्थ अर्थात मात्रुस्थान सुखस्थानाला आठवा होतो, म्हणून मात्रुसुखात अडचणी, वियोग, मानसिक विवंचना अशी अनिष्ट फळे.

व्ययस्थानचा अर्थात बाराव्या स्थानी शनी असेल, तर तो पंचम म्हणजे विद्याभ्यास, संततीस्थानाला आठवा, त्यामुळे शिक्षणात अपेक्षाभंग, संतती विलंबाने व त्यांच्याशी मतभेद.
ही फळे विचारात घेताना पत्रिकेतील इतर शुभाशुभ ग्रहयोगांचा सखोल विचार करणेही आवश्यक आहे. वरील निरीक्षणे ही केवळ दिशादर्शनासाठी दिली आहेत.

शनीचा दाब:
शनिमहात्म्याच्या ह्या अखेरच्या विवेचनात विवाहजुळणीत शनीचा दाब असणे म्हणजे काय, ते पाहू. गुणमेलन करताना विवाहजुळणीत मंगळदोष असेल, अर्थात पत्रिकेत मंगळ प्रथम, चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर अशा वेळी जी पत्रिका अशा पत्रिकेशी जुळवायची असेल तिच्यातही मंगळदोष असावाच लागतो. तसा तो नसेल, तर गुण जमुनही विवाहासाठी ती पत्रिका जुळत नाही. ह्याला फक्त एकच अपवाद आणि तो म्हणजे, जर मंगळदोष नसलेल्या पत्रिकेत जर शनीचा दाब असेल तर ती पत्रिका मंगळदोष असणाऱ्या पत्रिकेशी गुण जुळत असतील तर विवाहासाठी चालू शकते. आता शनीचा दाब म्हणजे पत्रिकेत जर शनी प्रथम, पंचम सप्तम किंवा दशम स्थानी असणे. मंगळदोष व शनीचा दाब ठरविताना ह्या दोन ग्रहांच्या पत्रिकेतील स्थानावरून सातव्या अर्थात विवाहस्थानच्या द्रुष्टिचा विचार घेतलेला आढळून येईल.             

 
धन्यवाद
सुधाकर नातू